खरीप हंगाम २०२१: शेतकऱ्यांनी स्वतः कडील सोयाबीन बियाणे वापरावे- कृषी विभाग

 अकोला,दि.२१ (जिमाका)- खरीप हंगाम २०२१ मध्ये शेतकऱ्यांनी स्वतःकडील सोयाबीन बियाणे वापरावे यासाठी  जनजागृती अभियान राबविण्यात येत असून  त्याबाबतच्या उपाययोजना  शेतकऱ्यांच्या माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी दिल्या आहेत.

त्या याप्रमाणे-

१) सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन  वर्षापर्यंत वापरता येते.

२) शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल.

३) मागील दोन वर्षात शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणापासुन उत्पादित झालेले सोयाबीन चालु वर्षी बियाणे म्हणून शेतकरी वापरु शकतात. तसेच ग्रामबिजोत्पादन, पीक प्रात्याक्षिके योजनांतर्गत शेतकरी समूह यांचेकडून आलेल्या उत्पन्नातून बियाण्यांची निवड करता येते.

४) प्रमाणित बियाण्यांपासून वरीलप्रमाणे आलेल्या उत्पादनातून चाळणी करून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी.

५) सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजुक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते त्यामुळे त्याची उगवणक्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळतांना काळजी घ्यावी.

६) बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.

७) साठवणुकीसाठी प्लास्टीक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवतांना त्याची थप्पी सात फुटापेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्यावी.

८) बियाणे हाताळतांना जास्त प्रमाणात आदळआपट होणार नाही याची दक्षता घ्यावी.

९) प्रति हेक्टरी बियाणे दर ७५किलोवरून ५० ते ५५ किलोवर आण्ण्यासाठी टोकन पद्धतीने किंवा प्लॅटरचा वापर करून पेरणी करावी.

१०) सोयाबीनची उगवणक्षमता ७०  टक्केपेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे,

११) ७५ ते १०० मिमि पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी.

१२) बियाण्याची पेरणी ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत करावे .

१३) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया

करावी.

१४) रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो

बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची

पेरणी करावी, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी , अकोला यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ