बकरी ईद कालावधीत गोवंश वाहतुकीसाठी विशेष पास
अकोला, दि.8(जिमाका)- बकरी
ईदच्या पार्श्वभुमिवर गोवंश जनावरांच्या
वाहतुकीसाठी पशुसंवर्धन विभागाकडून वाहनांसाठी विशेष पास जारी करण्यात येणार आहेत.
गोवंश जनावरांची वाहतुक करणाऱ्या वाहतुकदारांनी विशेष पासेस प्राप्त करुन वाहतुक
करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
बकरी ईद हा सण शांततेत साजरा व्हावा यासाठी व गोवंश हत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता
पोलिस विभाग, पशुसंवर्धन विभाग
आणि परिवहन विभागाने
सतर्क राहावे. गाय ,वळू आणि बैलांची अवैध वाहतुक किंवा कत्तल होत असल्याचे आढळल्यास तातडीने
कायदेशीर कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद पापळकर
यांनी आज येथे दिले. बकरी ईद शांतता व सलोख्याच्या
वातावरणात साजरी व्हावी. या करीता
या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा
पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. व्ही.बी.भोजने,सहाय्यक
आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रवीण राठोड, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. हरिप्रसाद मिश्रा, उपप्रादेशिक परिवहन
अधिकारी विनोद जिचकार, अन्न व औषध विभागाचे हे.म.मेतकर,मनपा उपायुक्त विजयकुमार
म्हसाळ, प्रदुषण मंडळाचे पी.एस. मेहरे,पशुसंवर्धन विभागाचे डॉ. विनोद हरणे, डॉ.
धुळे , डॉ. इंगळे, डॉ. कऱ्हे, डॉ. सोनवणे,
डॉ. गवई, डॉ. नम्रता वाघमारे, डॉ. सावजी , डॉ. जावरकर, डॉ. कडू, पोलीस विभागाचे तुषार नेवारे व सोळंके उपस्थित
होते.
महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा ) अधिनियम 1995
गोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागु
करण्यात आला आहे. या कायद्यान्वये
गोवंशाची कत्तल करण्यास आणि गोवंशाची
कत्तलीसाठी वाहतुक करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ
कार्यवाही करावी तसेच अन्न व औषध प्रशासन,
परिवहन विभाग व पशुसंवर्धन
विभाग यांनी या कालावधीत सतर्क
राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.तसेच या कालावधीत जिल्ह्यात अन्य कारणासाठी गोवंश
जनावरांची वाहतुक करावयाची असल्यास तसे प्रमाणपत्र पशुसंवर्धन विभागाकडून प्राप्त
करुन घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा