प्रधानमंत्री किसान मानधन योजना: शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
अकोला,दि.२१(जिमाका)- प्रधानमंत्री किसान मानधन
योजना सुरु करण्यात आली असून या योजनेत दि.३१
ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
यासंदर्भात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या
कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, १७ ते ४० वर्ष वयोगटातील ज्या
शेतकऱ्यांच्या नावे २ हेक्टर पर्यंत लागवडीलायक क्षेत्र आहे अशा सर्व अल्प व
अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली
आहे. ९ ऑगस्ट पासून ही योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना ऐच्छिक व अंशदायी
पेन्शन योजना असून पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या १ ऑगस्ट २०१९ रोजी असलेल्या
वयानुसार रुपये ५५ ते रुपये २०० पर्यंत
मासिक हप्ता वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत भरावयाचा आहे. या लाभार्थ्यांना वयाच्या ६०
वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सामाईक
सुविधा केंद्र (ई-सेवाकेंद्र) येथे जाऊन आपली
नोंदणी करावयाची आहे.या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, याची नोंद
घ्यावी. या नोंदणीसाठी लाभार्थी
शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, गाव नमुना
८-अ, आधारकार्ड, बॅंकेचे पासबुक, मोबाईल नंबर आदी सोबत न्यावे. येत्या ३१ तारखेपर्यंत
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या
योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी
केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा