लांबलेल्या पावसाच्या पार्श्वभुमिवर खरीप हंगामातील पिक नियोजन ; ८० ते १०० मि.लि.पावसाशिवाय पेरणी करु नका-कृषी विभागाची सुचना


अकोला, दि.२१(जिमाका)-  खरीप हंगामासाठी आवश्यक मान्सूनचा पाऊस येण्यास अपेक्षेपेक्षा उशीर झाला आहे. हवामान विभागाच्या तज्ज्ञांनुसार आता दि.२४ किंवा २५ पर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो. तथापि, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय काळजी घेणे आवश्यक आहे? यासंदर्भात कृषी आयुक्तालयाकडून मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत.

भारतीय हवामान विभागानुसार राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः ७ जूनच्या दरम्यान होते. यावर्षी  दि.११ जून रोजी कोकण विभागामध्ये  मान्सूनचे आगमन झाले आहे. परंतु राज्यात उर्वरित ठिकाणी मान्सूनचे आगमन झाले नाही. सद्यस्थितीत जून महिन्यात आतापर्यंत १३८.४० मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते, मात्र    प्रत्यक्षात १६.४० मि.मी (सरासरीच्या ११ टक्के) पाऊस पडलेला आहे. तसेच खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र १५२.९७लाख हेक्टर असून दि.२० जून अखेर प्रत्यक्षात १.९८ लाख  हेक्टर (१.३०टक्के) पेरणी झाली आहे .

           महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सूनचे आगमनास विलंब  होत असल्याने शेतकरी काळजीत आहे. या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी पेरणी करताना कोणती दक्षता घ्यावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीत काय नियोजन करावे? याबाबत कृषीमंत्री महोदयांनी अपर मुख्य सचिव कृषी, आयुक्त कृषी, सर्व कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि भारतीय हवामान विभागाचे वरीष्ठ शास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर  यांच्या समवेत दि.२० रोजी बैठक घेवून चर्चा केली. त्यानुसार हवामान बदलामुळे सामान्यपणे पाऊस येण्याचा कालावधी पुढे सरकला आहे. यामुळे नवीन सामान्य पाऊस कालावधी (New Normal Mansoon Period) येण्याचा कालावधी दि.२४ ते २५ जून असेल असा वेधशाळेने अंदाज वर्तविला आहे.

           हवामान विभागाच्या या अंदाजानुसार  दि. २४ व २५ जून नंतर अरबी समुद्रवरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळण्याची  शक्यता असल्याने सर्वदूर चांगला पाऊस पडण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे.

 

यासंदर्भात शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत.

 

१.      शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये.

२.   ८० ते १०० मि.लि. पाऊस पडल्याशिवाय सर्वसामान्य पेरणी करण्यात येऊ नये.

३.    शेतकऱ्यांनी लवकर येणाऱ्या व पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी.

४. मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने शेतकऱ्यांनी  धुळ पेरणी करू नये.

५.  पेरणी करताना साधारणपणे २० टक्के जादा बियाणांचा वापर करावा.

६.  सलग संपूर्ण क्षेत्रावर एकच पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा वापर करावा.

७.  पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीने (बीबीएफ ) पेरणी करावी.

८.  जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करण्यासाठी  आच्छादन ( मल्चींग ) सारख्या तंत्राचा वापर करावा.

९.   हवामान खात्यामार्फत पुढील पाच दिवसांचा पावसाचा अंदाज दिला जातो. या पावसाच्या अंदाजाची माहिती प्रसिद्धी माध्यमांद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येईल.

१०.           कृषि विद्यापीठ,कृषि विद्यापीठांचे संशोधन केंद्र व कृषि विज्ञान केंद्र यांच्या सहाय्याने स्थानिक आपत्कालीन पीक नियोजन करण्यात येत आहे. क्षेत्रीय तंत्रज्ञांना या माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत.

११.            राज्यात मान्सूनचा अंदाज घेवून पेरणीच्या वेळी पुरेशा प्रमाणात उत्तम दर्जाचे बी-बियाणे , खते व किटकनाशके

शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार व रास्त दरात उपलब्ध करुन देण्याची खबरदारी कृषी विभागाकडून घेतली जात आहे.

१२.           शेतकऱ्यांना जिल्ह्यात खरीप हंगामासाठी लागणाऱ्या कृषी निविष्ठांचा साठा उपलब्ध होइल यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

१३.           शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी आयुक्तालय स्तरावर २४x७ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. शेतकरी 1800-2334000   या क्रमांकावर संपर्क साधू शकतात,असे कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांनी कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ