‘गिव्ह इट अप’;अपात्र असतांनाही स्वस्त धान्य घेणाऱ्या ६५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

 अकोला, दि.१९ (जिमाका)- अपात्र असतांना शिधापत्रिकेवर मिळणारे स्वस्त धान्य घेऊन लाभ घेतल्याप्रकरणी जिल्ह्यात एकूण ६५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १९८१ जणांनी लाभ स्विकारण्यास अपात्र असून लाभ नाकारत असल्याचे अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी दिली आहे.

स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकेवर मिळणारा अन्न धान्याचा लाभ हा पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून शासनाने ‘गिव्ह इट अप’, ही योजना राबवून अशा अपात्र लाभार्थ्यांनी स्वतःहून लाभ त्याग करण्याचे आवाहन केले होते. त्याची मुदत २५ फेब्रुवारीपर्यंत  होती. तथापि, त्यानंतर अपात्र असतांनाही लाभ घेणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. असे अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी गावपातळीवर दक्षता समिती स्थापन करण्यात आली होती.  त्याशिवाय लोकांनी स्वतःहून आपले अर्ज दाखल केले होते.

जिल्ह्यात आतापर्यंत दक्षता समितीने प्राधान्य गट योजनेतील ६१४८, अंत्योदय अन्न योजनेतील ३०४, तर दारिद्र्य रेषेवरील  १२९७  असे एकूण ९०४३ लाभार्थी अपात्र असल्याचे कळविले आहे. तर ज्या लाभार्थ्यांनी स्वतःहून अर्ज दिले त्यात प्राधान्य गट योजनेतील १५८४, अंत्योदय अन्न योजनेतील ७४ तर दारिद्र्यरेषेवरील ३०५  अशा एकूण १९८१ जणांनी स्वतःहून अपात्र असल्याचे अर्ज दिले आहेत. थोडक्यात जिल्ह्यात सद्यस्थितीत ११०२४ लाभार्थी अपात्र आहेत,असे निदर्शनास आले आहे.

दरम्यान अपात्र असतांनाही लाभ घेणाऱ्या ६५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात बार्शीटाकळी येथे २५, तेल्हारा येथे १७, अकोला शहर येथे ८, अकोट येथे ५, बाळापूर येथे ७, पातूर येथे ३ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, असे पुरवठा शाखेने कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ