कृषी विभागाची किटकनाशके गोदाम तपासणी मोहिम; 36 कंपन्यांवर कारवाई: 18 कोटी 82 लाख रुपये किमतीच्या निविष्ठा विक्री बंदीचे आदेश
अकोला,
दि. 12(जिमाका)-आगामी खरीप
हंगाममध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण निविष्ठा उपलब्ध व्हाव्या
याकरिता किटकनाशके साठवणूक स्थळांची तपासणीसाठी मोहिम राबविण्याचे निर्देश कृषी
विभागाने दिले होते. यासंदर्भात कृषी आयुक्त पुणे यांनी दि.5 जून रोजी स्वतंत्रपणे
एका पत्राद्वारे निर्देश जारी केले होते. त्याअनुषंगाने अकोला जिल्ह्यात पथके
स्थापन करुन दोन दिवसात 63 गोदामांची तपासणी केली असुन 134 नमुने तपासणीसाठी
घेण्यात आले आहे. त्यापैकी 36 कंपन्यांचे 18 कोटी 82 लाख 6 हजार किमतीच्या
निविष्ठांची विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती आज कृषी
विभागाकडून देण्यात आली.
यासंदर्भात कृषी विभागाने
प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,
आगामी खरीप हंगामात
शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी गोडवून तपासणी,
विषबाधा होवू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना व इतर संरक्षणात्मक बाबींच्या
तपासणीकरिता जिल्हास्तरावर कृषी विभागाने पथक स्थापन करुन मोहिम राबविण्यात येत
आहे. ही मोहिम दि. 7 ते 9 जून दरम्यान राबविण्यात आली. जिल्ह्यातील गुणवत्ता
नियंत्रण निरीक्षक व स्थानिक निरीक्षक यांचे संयुक्त 14 चमू तयार करून तपासणी
करण्यात आली. तपासणी मध्ये पहिल्या दिवशी (दि. 7 रोजी) 29 कंपनींच्या गोदामांच्या
तपासणी केली असुन त्यामध्ये 49 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यात 13 कंपनीच्या
एकूण 5 कोटी 92 लाख 55 हजार किमतीच्या उत्पादनांना विक्रीबंद आदेश देण्यात आले.
तर दुसऱ्या दिवशी (दि. 8 रोजी) 34
कंपनींच्या गोदामांची तपासणी केली असुन त्यामध्ये 85 नमुने तपासणीसाठी घेण्यात
आले. त्यात 23 कंपनीच्या एकूण 12 कोटी 89 लाख 51 हजार किमतीच्या उत्पादनांना
विक्रीबंद आदेश देण्यात आले. तसेच एका खत व किटकनाशक विक्रेत्यावर विना परवाना खत
व किटकनाशकाची साठवणूक व विक्री करत असल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही
सुरु आहे, असेही कृषी विभागाने कळविले आहे. अश्याप्रकारे मागील दोन दिवसात कृषि
विभागाच्या पथकाने 63 कंपनीच्या गोदामांची तपासणी केली असुन 134 नमुने तपासणीसाठी
घेण्यात आले. 36 कंपन्यांचा एकूण 18 कोटी 82 लाख 6 हजार किमंतीच्या निविष्ठांना
विक्रीबंद आदेश देण्यात आले आहेत. तपासणी मोहिममध्ये काही कंपन्यांच्या गोडावून
मालकांनी कंपनीचा बोर्ड न लावणे, साठा नोंद वही अद्यावत न ठेवणे, कायद्यातील
तरतुदीप्रमाणे लेबल नसणे, काही उत्पादनाचा समावेश परवान्यामध्ये नसणे, साठवणूक
स्थळाचा समावेश परवान्यामध्ये नसणे ई. कारणामुळे विक्रीबंद आदेश देण्यात आलेले
आहेत. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या परिसरात कोणतीही कंपनी अथवा कृषि निविष्ठा विक्रेता
यांच्या बाबत तक्रार असल्यास कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे
आवाहनही कृषी विभागाने केले आहे.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा