हरभरा पिकावरील घाटेअळी प्रादुर्भाव नियंत्रण

 


अकोला,दि.22 (जिमाका)-  हरभऱ्याचे पिक हे सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. साधारणत: आठ ते दहा  दिवसांनतर फुलोरा अवस्थेत प्रवेश करेल या दरम्यान घाटे अळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. त्याबाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथील किटकशास्त्र विभागातून नियंत्रण उपाययोजना व सुचना देण्यात आल्या आहेत.

लक्षणे व  प्रारंभिक अवस्थाः- घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड असुन या किडींची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंडयावर, ळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातून दोन ते तीन दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरीत द्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात व गळून पडतात. थोड्या मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने व कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांद्याच शिल्लक राहतात. पुढे पिक फुलोऱ्यावर आल्यावर ह्या अळीचा प्रादुर्भाव वाढतो व अळ्या प्रामुख्याने फुले व घाट्यांचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळ्या घाट्याला छिद्र करून आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक अळीसाधारणत: ३०-४० घाट्यांचे नुकसान करतात.

       उपाययोजनाः-    घाटे अळीचे परभक्षक उदा. बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी इ. पिकामध्ये फिरून घाटे अळ्या वेचून त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी किटकनाशकाची फवारणी केल्यास पक्षी किटकनाशकांच्या वासामुळे शेतामधे येणार नाहीत. त्यामुळे किटकनाशकाचा जास्त वापर टाळावा. ज्या शेतामध्ये  मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी  थांबे म्हणुन उपयोग केला नसेल त्या शेतामधे बांबुचे त्रिकोणी पक्षी थांबे (प्रती हेक्टर २० पक्षी थांबे) तयार करून शेतामधे लावावे. त्यामुळे पक्षांचे अळ्या वेण्याचे काम सोपे होते. कामगंध सापळ्याचा वापर करावा. यासाठी धाटे अळीचे कामगंध सापळे (हेक्झाल्युर) एकरी दोन किंवा हेक्टरी पाच सापळे याप्रमाणे लावावेत, सापळ्यामधे सतत तीन दिवस आठ ते दहा पंतग आढळल्यास व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. शेतकरी बंधुंनी आपल्या पिकाचे निरीक्षण करून किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा ४० ते ५० टक्के पिक फुलोऱ्यावर आल्यानंतर घाटेअळीचे व्यवस्थापनासाठी खालील दोन फवारण्या १० लिटर पाण्यात मिसळून कराव्या.  पहिली फवारणी ५० टक्के फुलोरावर असतांना निंबोळी अर्क पाच टक्के किंवा एच.ए.एन.पि.व्हि (1x109 पिओबी किवा मिली) ५०० एल.ई./हे. किंवा क्विनॉलफॉस २५ ई.सी., २० मि.ली. तर दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसानंतर इमामेक्टीन बेझोएट पाच टक्के एस जी तीन ग्रॅम किंवा ईथिऑन ५० टक्के ईसी २५ मिली किंवा फ्ल्युइँडामाईड २० टक्के डब्ल्युजी मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलिपोल १८.५ टक्के एस.सी.३.५ मिली या प्रमाणे उपाययोजना करण्याचे आवाहन किटकशास्त्र विभागाने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ