सावधानतेचे पाऊल कोरोनामुक्तीकडे; जिल्ह्यातील 747 गावे कोरोना मुक्त
अकोला,दि.28(जिमाका)- कोरोना
महामारीच्या प्रकोपाने भेडसावलेला अकोला जिल्हा
आता अत्यंत सावधानतेने
कोरोनामुक्तीकडे पाऊल टाकत आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी होत असतांना
जिल्ह्यातील 844 पैकी 747 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. ‘गाव करी ते राव न करी’, या
म्हणीप्रमाणे गावकऱ्यांनी एकजुटीने कोरोना विरुद्ध आपपाल्या गावात मुकाबला केला
आहे. त्याचीच फलनिष्पत्ती म्हणजे आजचे ग्रामीण भागात कोरोनामुक्तीचा मोकळा श्वास
घेतला जातोय.
याबाबत
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात 535 ग्रामपंचायतीतील
844 गावांपैकी 793 गावे कोरोना
विषाणूने बाधीत होते. तर 51 गावामध्ये कोरोना विषाणूचा
प्रादुर्भावच दिसून आला नाही.
कोरोनाची
दुसरी लाट कमी होत असून सद्यास्थितीत 747 गावे कोरोना मुक्त झाली
आहेत. या गावांमध्ये एकही कोरोनाबाधीत रुग्ण नसून सर्व रुग्ण बरे होऊन गाव कोरोना
मुक्त झाले आहे. सद्यस्थितीत 46 गावांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असून या गावांमध्ये 112 कोरोना बाधीत रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात
31 प्राथमिक आरोग्य केंद्र, 178 उपप्राथमिक
आरोग्य केंद्र, पाच ग्रामीण रुग्णालय व मुर्तिजापूर येथे
उपजिल्हा रुग्णालय आहे. या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्णांना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार
उपचार केला जातो, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश
आसोले यांनी दिली.
कोरोना
विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन आवश्यक आहे.
सोबतच प्रशासनामार्फत कोविड प्रतिबंधक लसीकरण
मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 47 लसीकरण केंद्रावर
कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे साठवण व वितरण स्थानिक स्तरावर केले जातात. आजपर्यंत
(दि.28जून) जिल्ह्यामध्ये तीन लक्ष 88 हजार
360 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी तीन लक्ष
05 हजार 276 व्यक्तींना (21 टक्के) लसीकरणाचा पहिला डोस दिला गेला. तर
83 हजार 84 व्यक्तींना (0.6 टक्के) लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला. 45
वर्षावरील नागरिकांना द्यावयाचा लसीकरणाचा पहिला डोस दोन लक्ष 20
हजार 906 व्यक्तींना (30 टक्के) देण्यात आला तर 62 हजार 398 व्यक्तींना (10.3 टक्के) दुसरा डोस देण्यात आला. तसेच
18 ते 44 वयोगटातील 59 हजार 543 नागरिकांना (सात
टक्के) लसीकरणाचा पहिला डोस तर सहा हजार 537 व्यक्तींना (0.7
टक्के) दुसरा डोस देण्यात आले आहे अशी माहिती माता व बालसंगोपन
अधिकारी डॉ.मनिष शर्मा यांनी दिली.
तिसऱ्या
लाटेच्या सावटाखाली असतांना गावकऱ्यांनी
एकजूट दाखवून केलेली प्रत्येक गावाची कोरोनामुक्ती ही शहरी लोकांसाठीही अनुकरणीय
ठरावी.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा