स्वातंत्र्यदिनाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा एकजुटीच्या बळावर कोरोनावर मात करु- पालकमंत्री ना. कडू
अकोला,दि.15(जिमाका)- कोविड १९ या विषाणू संसर्गाच्या जागतिक संकटाचा आपण अभूतपूर्व एकजुटीने सामना करत आहोत. त्यामुळे या संकटावर आपण नक्कीच मात करु, असा ठाम विश्वास राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे व्यक्त केला.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय
स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे
जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व
बालविकास इतर
मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त
जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार
राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू
कडू यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना
देण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधानपरिषद
सदस्य आ. गोपिकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी
नरेंद्र लोणकर, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच विविध विभागांचे
प्रमुख उपस्थित होते. यावेळी पोलीस दलाच्या वाद्यवृंदाने वाजविलेल्या राष्ट्रगिताच्या धुनवर राष्ट्रगीत गायन करुन उपस्थितांना आपल्या
राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर उपस्थितांनी
यावेळी सामाजिक अंतर राखले होते.
त्यानंतर आपल्या मार्गदर्शनात पालकमंत्री ना. कडू यांनी, देशासाठी
स्वातंत्र्य संग्रामात त्याग आणि बलिदान केलेल्या हुतात्मे, स्वातंत्र्य सैनिक
यांच्या त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केले. ते पुढे म्हणाले की, कोविड १९ या
विषाणू संसर्गाच्या जागतिक संकटाचा आपण अभूतपूर्व एकजुटीने सामना करत आहोत.
त्यामुळे या संकटावर आपण नक्कीच मात करु, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. या
संकटकाळात सर्व डॉक्टर्स, सर्व नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस
कर्मचारी, प्रशासनातले कर्मचारी- अधिकारी या साऱ्यांनी दाखवलेल्या अतुलनीय
कार्यशक्तीचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
ते म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रत्येकाच्या
हाताला काम मिळावे यासाठी उद्योगपूर्ण गाव ही योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील
आहोत. तसेच जिल्ह्यातील स्वातंत्र्य
सैनिक, हुतात्मा यांचे स्मरण राहण्यासाठी पुस्तकरुपी संकलन करण्यात येईल असेही
त्यांनी सांगितले. कोरोना संकटावर मात
करतांना सर्व अधिकारी कर्मचारी, आरोग्य व प्रशासन यंत्रणा यांच्या अथक परिश्रमातून
अकोला जिल्हा राज्यात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याचा दर असणारा जिल्हा म्हणून ओळखला
जात आहे, याबद्दल त्यांनी कौतूक केले. एकजुटीने कोरोना विरुद्धचा लढा आपण जिंकू
असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यानंतर त्यांनी समारंभास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक,
विरमाता, विरपत्नी, कोविड योद्धा यांची भेट घेतली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा