लंपी प्रतिबंधासाठी पशुधनाचे लसीकरण करून घेण्याबाबत आवाहन

 लंपी प्रतिबंधासाठी पशुधनाचे लसीकरण करून घेण्याबाबत आवाहन

अकोला, दि. 21 : राज्यातील गोवंशीय पशुधनात लंपी आजाराचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पशुधनाच्या लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लसीकरण पूर्ण करून घ्यावेअसे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

            राज्यात काही ठिकाणी पशुधनात लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. जिल्ह्यातील गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी पशुसंवर्धन यंत्रणेला दिले आहेत. पशुपालकांनीही लसीकरण पूर्ण करून घ्यावे व आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन यंत्रणेने केले आहे.  

जिल्ह्यात सुमारे 2 लाख 33 हजार 271 गोवंशीय पशुधन आहे. त्यातील 1 लाख 16 हजार 385 पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लंपी रोगाचा संसर्ग ‘कॅप्रिपॉक्स’ विषाणू मुळे होतो. या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणु देवी विषाणु गटाचे असतात. लंपीचा प्रसार  जनावरांना डास, चावणाऱ्या माश्या, गोचिड, चिलटे, बाधित जनावरांचा स्पर्श, दुषित चारा-पाणी यापासुन होतो.

गोवर्गीय सर्व वयाच्या जनावरांना हा आजार होऊ शकतो. या साथीच्या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे जनावराच्या शरीरावर कडक व गोल गाठी येतात. जनावरे चारा कमी खातात अथवा बंद करतात. पाणी पिण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. बाधीत जनावरांना सुरुवातीस मध्यम स्वरुपाचा ताप येतो. डोळ्यातून व नाकातून चिकट स्त्राव वाहतो, सर्व अंगावर गाठी येऊ लागतात. या गाठी विशेषत: डोके, मान, पाय व कासेत येतात. जनावरातील दूध उत्पादन क्षमता अत्यंत  कमी होत जाते. काही जनावरांच्या पायावर सूज येते. जनावरांच्या फुप्फुस, श्वासनलिका, अन्न नलिकेवर मोठया प्रमाणात पुरळ येतात.  

पशुपालकांनी घ्यावयाची काळजी

        चारा कमी खाणाऱ्या जनावरांचा तात्काळ ताप मोजावा. नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधुन उपचार करावा. बाधित जनावरे ही निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावी. कोणत्याही संभाव्य रोगी जनावरांस निरोगी जनावरांच्या कळपापासुन विलग ठेवावे. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरास गावातील चराऊ कुरणावर इतर निरोगी जनावरांसह सोडू नये. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने  डास, माश्या, गोचिडसारख्या किटकांवर औषधांचा वापर करुन त्यांचा नायनाट करावा. निरोगी जनावरांच्या अंगावर कीटक येवू नयेत म्हणुन त्यांच्या अंगावर औषध लावावे व गोठ्यामध्ये कीटकनाशक फवारणी करावी. आजारी व निरोगी जनावरांवर औषध फवारणी करू नये. रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच जनावरांच्या स्थानीक बाजारांमध्ये नेऊ नये. बाधित जनावराच्या गाठीचे रुपांतर जखमेत झाल्यास जखमेत जंतूसंसंर्ग होऊ नये यासाठी जखमेवर औषधी लावावी. पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण करून घ्यावे. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमान्वये पशुंमध्ये या रोगाची लक्षणे आढळुन आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आदींनी लेखी स्वरूपात नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे.  

 00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ