विशेष लेखः- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना विमा कंपनीमार्फत सन २०२१-२२ पर्यंत राबविण्यात येत होती. मात्र आता दि.१९ एप्रिल २०२३ रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार, 'गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना' राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता वहितीधारक शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य (आई-वडील,शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणीही एक व्यक्ति) असे एकूण दोन जणांकरिता योजना राबविण्यात येणार आहे.

                   विमा कंपन्या तसेच विमा सल्लागार कंपन्याकडून योजना व्यवस्थित राबविली जात नसल्यामुळे राज्य शासनाने आधीची विमा योजना बंद करून सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे. नवी योजना प्रत्येक दिवसाच्या २४ तासांसाठी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे योजनेतील पात्र व्यक्तिला केव्हाही अपघात झाला तरी मदत मिळण्यास अपात्र न ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र शासनाच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्तांसाठी चालू असलेल्या योजनेचा लाभ घेतल्यास नव्या योजनेचा लाभ मिळणार नाही.

           अपघातग्रस्त शेतकऱ्याबाबत प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यानंतर, सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचे पथक प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करून त्याबाबतचा अहवाल तहसिलदार यांना घटना झाल्यापासून ८ दिवसांच्या आत सादर करतील. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून पात्र असलेले विमा प्रस्ताव संबंधित तहसिलदार यांना सादर करतील. तदनंतर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठकीमध्ये ३० दिवसाच्या आत संबंधित शेतकरी/शेतकरी कुटुंबाच्या वारसदारांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात येवून संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत संबंधित अपघातग्रस्त शेतकरी/वारसदारांच्या बँक खात्यात निधी जमा करण्यात येईल.

योजनेअंतर्गत समाविष्ट बाबीः-

 १. रस्ता अपघात/रेल्वे अपघात

२. पाण्यात बुडून मृत्यू

३. जंतुनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा

४. विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात

५. वीज पडून मृत्यू

६. खून

७. उंचावरून पडून झालेला अपघात

८. सर्पदंश व विंचूदंश

९. नक्षलाईटकडून झालेल्या हत्या

१०. जनावरांच्या खाल्यामुळे/चावण्यामुळे जखमी/मृत्यू

११.बाळंतपणातील मृत्यू

१२. दंगल

१३. अन्य कोणताही अपघात,

 या अपघाताचा समावेश आहे.

समाविष्ट नसलेल्या बाबीः-

 १. नैसर्गिक मृत्यू

२. विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व

३. आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे

४. गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करतांना झालेला अपघात

५. अंमली पदार्थाच्या अमलाखाली असताना झालेला अपघात

६. भ्रमिष्टपणा

७. शरीरांतर्गत रक्तस्त्राव

८. मोटार शर्यतीतील अपघात

९. युद्ध

१०.सैन्यातील नोकरी

११. जवळच्या लाभधारकाकडून खून

 

योजनेअंतर्गत अनुज्ञेय लाभ: -

१.      अपघाती मृत्यू- दोन लाख रुपये

२.      अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे- दोन लाख रुपये.

३.      अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे- दोन लाख रुपये.

४.    अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी होणे- एक लाख रुपये.

शेतकऱ्यांसाठी ही सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आहे. जिल्ह्यातील अपघातग्रस्त शेतकरी / शेतकऱ्यांचे वारसदार यांनी दि.१९ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात घटना घडली असेल तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घ्यावा. त्यासाठी तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

-संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ