डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव: नागरिकांना सर्व सुविधांची सुसज्जता उपलब्ध करा- शांतता समिती बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
अकोला,दि. १३(जिमाका)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते, याकालावधीत सामाजिक सलोखा कायम राखून उत्साहाचे वातावरण राखणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधांची सुसज्जता उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी सर्व यंत्रणांना दिले.
यासंदर्भात आज नियोजन भवनात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात
आली होती. बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तहसिलदार
सुनिल पाटील आदी उपस्थित होते. बैठकीस उपस्थित भिम जयंती उत्सव समित्यांनी
आपापल्या समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने मिरवणूक परवानगी, वाहतुकीचे नियोजन,
रात्रीच्या वेळी पथदिव्यांची उपलब्धता, स्वच्छता राखण्यासंबंधीत उपाययोजना आदी मुद्यांचा
समावेश होता. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले की, महानगरपालिकेने जयंती उत्सव साजरा होत असलेल्या
ठिकाणांची स्वच्छता राखण्याची उपाययोजना करावी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध करावे,
उत्सव संपल्यावरही तातडीने स्वच्छता राबवावी. पोलीस व वाहतुक शाखेने मिरवणूक मार्ग
व अशोक वाटिकेकडे जाणारे मार्ग याकडे
जाणारे सर्व मार्गांच्या वाहतुकीचे नियोजन करावे. या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित
राहिल यासाठी उपाययोजना करावी. सर्व नागरिकांनी शांततेत,गुण्यागोविंदाने व आनंदात डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन सौरभ कटीयार यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा