रस्ते अपघात रोखण्यात अकोला ठरला प्रथम क्रमांकाचा जिल्हा जुलै ते सप्टेंबर तिमाहित रस्ते अपघाताचे प्रमाण ११ पर्यंत घटले
अकोला, दि.६(जिमाका)- जुलै ते सप्टेंबर २०२२ या तिमाहीत अकोला जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण
घटले असून ते ३८ वरुन ११ वर आले आहे.
अशाप्रकारे प्राणघातक अपघात रोखण्यात अकोला जिल्हा हा प्रथम क्रमांकाचा जिल्हा
ठरला आहे, अशी माहिती उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिली आहे.
यासंदर्भात अधिक
माहिती अशी की, मागील वर्षी जुलै ते सप्टेंबर या तिमाहिती अकोला जिल्ह्यात रस्ते
अपघाताची संख्या ३८ होती. यासंदर्भात
रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. त्यात रस्ता सुरक्षा तपासणी व जनजागृतीवर भर
देण्यात आला. विना हेल्मेट वाहन चालविणे,
वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करणे,
धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे,
रस्ता सुरक्षा नियमांचे पालन न करणारे वाहन चालकांवर कारवाई या प्रकारचे
उपक्रम व दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यात श्रीमती दुतोंडे यांनी स्वलिखित रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा देऊन
वाहनचालकांना रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत गांभिर्य निर्माण केले. एकंदर यामुळे वाहनचालकांमध्ये रस्ते
सुरक्षेबाबत जनजागृती होऊन रस्ते अपघाताचे प्रमाण ३८ वरुन ११ पर्यंत खाली आले आहे.
अशा प्रकारे अपघात रोखण्यात अकोला जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला
आहे. असे असले तरी हे प्रमाण शून्यावर
येणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी व वाहनचालकांनी रस्ते सुरक्षा नियमांचे
पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन जयश्री दुतोंडे यांनी
केले आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा