वीज कोसळणे, अतिवृष्टी, पुरस्थितीत नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
अकोला,दि.१२(जिमाका)- भारतीय हवामान विभाग नागपूर यांच्या संदेशानुसार येत्या काही दिवसात विदर्भातील सर्व जिल्ह्यात अतिवृष्टी, वीज कोसळणे, पुरस्थिती बाबत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने जारी केलेल्या सुरक्षा
सुचना याप्रमाणे-
१) वीज कोसळण्याचे वातावरण तयार झाल्यास घरातील टिव्ही, संगणक,
फ्रिज इ. विद्युत उपकरणे बंद करुन विद्युत प्रवाह जोडणीपासून दूर करावे.
२) मोबाईल, दूरध्वनीचा वापर टाळावा.
३) दारे खिडक्या बंद
करुन घरात सुरक्षित आश्रय घ्यावा.
४) आकाशात वीज चमकल्यानंतर दहा सेकंदांनी मेघ गर्जनेचा आवाज
आल्यास त्या भागात तीन किमी परिसरात वीज कोसळण्याची शक्यता असते,असे समजावे.
५) शेतात काम करतांना जेथे असला तेथेच थांबा, पायाखाली लाकूड,
कोरडा पाला पाचोळा ठेवावा. दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर हात ठेवून डोके
जमिनीकडे झुकवून थांबावे. डोके जमिनीला टेकवू नये.
६) आपले वाहन विजेचे
खांब, झाडे यापासून दूर ठेवून सावकाश चालावे.
७) पुरस्थिती निर्माण झाल्यास नदी, नाला काठावर पूर पाहण्यास
गर्दी करु नये.
८) नदीनाल्याच्या
पुराच्या पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करु नये. सद्यस्थितीत पाऊस सुरु
असून केव्हाही नदीची पाण्याची पातळी वाढू
शकते.
९) पुलावरुन पुराचे पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये.
१०) आपात्कालीन स्थितीत
जवळचे पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय,
अग्निशमन विभाग, नगरपालिका, महानगरपालिका यांच्याशी संपर्क साधावा.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा