वीज निर्मिती केंद्रांच्या परिसरात जैव विविधता उद्यानांची निर्मिती करा- उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

 






अकोला,दि.२८(जिमाका)- प्रदूषण तसेच अन्य पर्यावरणीय समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून पारस सह राज्यातील सर्व वीज निर्मिती केंद्रांच्या परिसरात जैव विविधता उद्याने निर्माण करण्यात यावेत, त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून प्रस्ताव पाठवावे,असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले.

पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे आज डॉ.राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अकोला आणि वाशीम या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला.या बैठकीस महावितरणचे अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, महापारेषणचे अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता बी.टी. राऊत, महानिर्मितीचे पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल खराटे तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

याबैठकीत अकोला,बुलडाणा,वाशीम या जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. आढावा निर्मिती, पारेषण व वितरण या अनुषंगाने घेण्यात आला.

डॉ.राऊत यांनी उपस्थितांना निर्देश दिले की, वीज निर्मिती प्रकल्पांच्या परिसरात प्रदूषण व अन्य पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजना म्हणून जैवविविधता उद्यानांची निर्मिती करावी. त्यासाठी पर्यावरण शास्त्र तज्ज्ञाकडून प्रकल्प अहवाल तयार करून घ्यावा. वीज निर्मिती दरम्यान उत्सर्जन होणाऱ्या रासायनिक घटकांचे स्वरूप व प्रमाण लक्षात घेऊन त्यास अनुकूल अशा वनस्पतींची लागवड करण्यात यावी. वृक्ष लागवड तसेच सौर ऊर्जेचा वापर याबाबींचा समावेश त्यात करून जैव विविधता व सौर ऊर्जा असे मॉडेल विकसित करावे,सविस्तर प्रकल्प अहवालासह प्रस्ताव पाठवावा,असे त्यांनी सांगितले.

त्याच प्रमाणे कर्मचारी वसाहतींच्या परिसरात कर्मचाऱ्यांची मुले-मुली यांच्यासाठी  अद्ययावत ग्रंथालय उभारावे. त्यात विद्यार्थी विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी. वीज निर्मितीसाठी आवश्यक कोळशाची उपलब्धता ठेवण्याबाबत दक्ष रहावे, असे त्यांनी सांगितले.

महावितरणने थकबाकी वसुलीसाठी गावोगावी जाऊन शेतकरी तसेच अन्य ग्राहकांना विविध योजनांचे स्वरूप समजावून सांगावे, यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल, असेही डॉ.राऊत यांनी स्पष्ट केले.

महापारेषणने उन्हाळ्याच्या काळात ज्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होतो, अशा तांत्रिक कारणांची माहिती अद्ययावत करून ठेवावी,जेणेकरून आपत्तीच्या काळात उपाययोजना करता येणे शक्य होईल. त्यानंतर त्यांनी रोहित्र क्षमता वाढ,उपकेंद्र उभारणी,रीऍक्टर उभारणी आदी बाबींचाही आढावा घेतला.

अधिकाऱ्यांना प्रशिक्षण सुविधा

राज्यातील महानिर्मिती, महापारेषण, महावितरणच्या अधिकाऱ्यांना आपले ज्ञान अद्ययावत करता यावे यासाठीही त्यांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.

योजनांची व्याप्ती वाढविण्याचे सूतोवाच

अनुसूचित जाती जमातीच्या ग्राहकांसाठी असणारी डॉ.आंबेडकर जीवन प्रकाश योजनेची व्याप्ती वाढविण्यात येऊन या योजनेचा लाभ ओबीसी घटकांना मिळावा म्हणून त्यांचाही समावेश या योजनेत करण्यात येईल, तसेच वसंतराव नाईक कृषी वीज जोडणी योजनेलाही मुदतवाढ देणार असल्याचे सूतोवाच डॉ. राऊत यांनी केले.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ