राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा: खेळात सातत्य आणि खिलाडूवृत्ती महत्त्वाची-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


            अकोला,दि.२५(जिमाका)-खेळाडूंनी  खेळात  सातत्य टिकवून ठेवावे तसेच खेळातील जय पराजय हा खिलाडुवृत्तीने स्विकारावा, हे दोन्ही गुण महत्त्वाचे असून त्याचा पुढील आयुष्यात खूप उपयोग होतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.
            क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अकोला व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला  यांचे  संयुक्त विद्यमाने १४,१७,१९ वर्षाआतील मुले/मुली  राज्यस्तरीय  शालेय बॅडमिंटन स्पर्धांचे उद्घाटन  बुधवार (दि.२५) रोजी जिल्हा क्रीडा संकुल, वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. 
            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी   आयुष  प्रसाद, क्रीडा व युवक सेवा अमरावती विभागाच्या उपसंचालक प्रतिभा देशमुख,  जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार  प्राप्त  नाजुकराव पखाले,  जिल्हा क्रीडा  परिषदचे  सदस्य जावेद अली उपस्थित होते.
            खेळाडूंना शुभेच्छा देत जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, सर्व खेळाडूंनी खेळाडू वृत्तीने स्पर्धेत भाग घेवून यशस्वी व्हावे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा व युवक सेवा अमरावती विभागाचे उपसंचालक प्रतिभा देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन मनपाच्या क्रीडा शिक्षक सारिका तिवारी  व राजकुमार तडस यांनी केले उपस्थितांचे आभार जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी मानले.
            जिल्हा क्रीडा परिषदेचे ध्वजारोहण तसेच क्रीडा ज्योत प्रज्वलन मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले. यावेळी  विद्यार्थ्यांना  शपथ देण्यात आली. स्पर्धेची सुरूवात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शटल टॉस करून केली.
            दोन दिवस चालणाऱ्या  या राज्यस्तरीय  शालेय बॅडमिंटन स्पर्धेतुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात येणार आहे.
            यावेळी जिल्हा बॅडमिंटन असोशिएशनचे सचिव सचिन राऊत , उपाध्यक्ष तुषार देशमुख , पंच प्रभाकर धुमाळे, कलिमुद्दीन फारुखी, विशाल गर्जे, आनंद देशमुख, गुरूनाथ तुपकर, मनोज कान्हेरे, मल्लार कुळकर्णी, राजेंद्र जळमकर, डॉ. अमोल रावणकर, क्रीडा अधिकारी कुळकर्णी व नाकट यांच्यासह  बॅडमिंटनचे प्रशिक्षक,  खेळाडू व  त्यांचे पालक तसेच क्रीडा प्रेमी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ