खरीप पुर्व कृषि मेळावा; शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सक्षमीकरण कालसुसंगत- कुलगुरू डॉ. शरद गडाख








अकोला,दि. 19 (जिमाका)- पारंपरिक शेती पद्धतीमध्ये आंतरपिकांचा समावेश आणि शेतीपूरक व्यवसायाची सक्षम जोड निश्चितच फायदेशीर ठरत असून आज व्यावसायिक शेतीची संकल्पना अवलंबतांना शेतकरी उत्पादक कंपन्याचे सक्षमीकरण काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ येथे विस्तार शिक्षण संचालनालयावतीने आयोजित खरीप पूर्व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य तथा आमदार अमोल मिटकरी, विधानसभा आमदार रणधीर सावरकर, विद्यापीठ कार्यकारी परिषद विठ्ठल सरप पाटील, हेमलता अंधारे, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिता रोकडे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे, अमरावती विभागीय कृषी सहसंचालक  किसन मुळे, शेतकरी प्रतिनिधी श्रीकृष्ण ठोंबरे, विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, अधिष्ठाता कृषि डॉ. श्यामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. प्रकाश नागरे, प्रगतिशील शेतकरी व विविध भागातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुलगुरु डॉ. गडाख मार्गदर्शन करताना म्हणाले की, विदर्भात बहुतांश भागात सिंचनाची अल्प क्षमता असून कोरडवाहू पिकांच्या उत्पादकतेतील घट, पाण्याच्या कमतरतेमुळे जमिनीतून पिकांकरिता आवश्यक असणाऱ्या मूलद्रव्यांची  जेमतेम उपलब्धता आदींचा पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो. मागील पन्नास वर्षांचा सरासरी पर्जन्यमानाचा आढावा घेता पाऊसमान कमी झाले नसल्याचे सांगतानाच पाऊस पडण्याच्या तीव्रतेमध्ये आणि दिवसमानांमध्ये फरक झाला आहे.  अशा परिस्थितीमध्ये कपाशी व सोयाबीन पिकासोबत योग्य आंतरपीकाची लागवड करून पावसाच्या लहरीपण मुळे होणारे नुकसान टाळता येणे शक्य असल्याचे सांगितले. तसेच एकात्मिक शेती पद्धती कालसुसंगत असून शाश्वत शेतीसाठी पिकांची निवड, पिकांची फेरपालट, शेण, गोमूत्र, दुधासह शेतकामासाठी पशुधन आणि परिवारातील सदस्यांचे योगदान काळाची गरज असल्याचे प्रतिपादन देखील डॉ. गडाख यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात सांगितले.

नॅनो युरियाचे फायदे शेतकऱ्यांपर्यत पोहोचवा- आ.रणधीर सावरकर

 शेतकऱ्यांनी घरच्या बियाणे वापरतानी योग्य पद्धतीने बिजप्रक्रिया करुन घ्यावे. कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनासोबतच  तंत्रज्ञान व पिक वाणांचा अवलंब करावा. नॅनो युरिया पिकांसाठी लाभदायक असून पारपांरिक युरियाच्या तुलनेने अधिक परिणामकारक आहे. नॅनो युरियाचे फायदे शेतकरी बांधवापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. याकरिता शेतकऱ्यांना प्रशिक्षण कार्यक्रम, मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहचवा. नॅनो युरिया वापरास चालना द्या, असे आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.

शेतजमिनीच्या संरक्षणासाठी अनुदानावर कुंपण योजना अत्यावश्यक- आ.मिटकरी

शेतकरी बांधवांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव व खरेदीची हमी मिळण्यासह वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी शेतीच्या बांधावर कुंपणाची योजना काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. पारंपारिक पिकांना आधुनिकतेची जोड देत शेती व शेतकरी विकास करणे शक्य असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.

याप्रसंगी बोलताना महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्री यांनी शेतकरी बांधवांना पेरण्याची घाई करु नये. पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासा व बीज प्रक्रिया करूनच बियाण्याची पेरणी करण्याचे आवाहन केले. पट्टा पद्धतीचा वापर अधिक फलदायी असल्याचे सांगताना पद्धतीचा प्रभावी अवलंब करण्याचे आवाहन यावेळी केले. तर श्री. कलत्री यांनी महाबीजकडे सर्वच प्रकारच्या बियाणांची योग्य प्रमाणात उपलब्धता असल्याचे शेतकरी बांधवांना आश्वस्त केले.

अमरावती विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी प्रत्येक शेतकऱ्याला कोणत्या ना कोणत्या योजनेचा फायदा निश्चितच मिळणार असल्याने महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.  यावेळी आपल्या प्रास्ताविकात संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. बी. उंदिरवाडे यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने शेतकरी बांधवांच्या  पिकांसंबंधीच्या समस्यांवर सांगोपांग चर्चा होऊन निराकरण होत असल्याचे म्हटले. कृषी विद्यापीठाची कृषी संवादिनी शेतकऱ्यांकरिता ग्रामगीता असल्याचे सांगून विद्यापीठाच्या या प्रकाशनामध्ये सर्व पिकांच्या लागवड तंत्राविषयीची अद्यायावत माहिती प्रकाशित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कापूस पिकावरील गुलाबी बोंड आळी तसेच सोयाबीन मूग उडीद तूर व मका पिकावरील किडी-रोगांच्या संबधी विस्तृत मार्गदर्शन करून येणाऱ्या खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांनी एकत्रितपणे व्यवस्थापनात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. प्रगतिशील शेतकरी श्रीकृष्ण ठोंबरे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना महाबीजचे बियाणे उत्कृष्ट प्रतीचे असल्याचे नमूद करून आपण स्वतः विद्यापीठ निर्मित बीज वाणांचा नियमित वापर करत असल्याचे सांगितले.

तांत्रिक सत्रात विषय तंज्ज्ञानी केले मार्गदर्शन

तांत्रिक सत्रामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठच्या विषय तंज्ज्ञानी शेतकऱ्यांना सादरीकरणाव्दारे मार्गदर्शन केले. यामध्ये डॉ. अनिल करुणाकर यांनी खरीप हंगामातील हवामानाचा अंदाज या विषयावर, तर डॉ. नविन कायंदे यांनी कपाशी सुधारीत लागवड तंत्रज्ञान, डॉ. हेमंत डिके यांनी सोयाबिन सुधारित लागवड तंत्रज्ञान, डॉ. धनराज उंदीरवडे व डॉ. श्यामसुंदर माने यांनी खरीप पीक कीड व्यवस्थापण या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी समर्पक उत्तरे देऊन शंकानिरसन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजीव कुमार सलामे  यांनी तर आभार प्रदर्शन विस्तार कृषी विद्यावेत्ता प्रकाश घाटोळ यांनी केले. याप्रसंगी शेतकरी बांधवांनी विद्यापीठ संशोधित नवीन पीक वाण बियाणे खरेदीसाठी  उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ