आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव शासनाकडे; शेतकऱ्यांचे दावे ५ जून पर्यंत स्विकारणार
अकोला,दि.१५(जिमाका)- जिल्ह्यात
पीक विमा काढण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आयसीआय लोम्बार्ड या विमा कंपनीने
कामात दिरंगाई केली व शेतकऱ्यांना विमा लाभापासून वंचित ठेवल्याप्रकरणी या कंपनीस
काळ्या यादीत टाकण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे, अशी माहिती
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली. दरम्यान अद्यापही शेतकऱ्यांचे विमा दावे
प्रलंबित असल्यास हे दावे दि.५ जून पर्यंत स्विकारण्यात येतील असेही कळविण्यात आले
आहे.
पीक विमा
काढलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक आपत्ती पोटी देण्यात
आलेले विमा भरपाई मोबदला देण्यासाठी करावयाची प्राथमिक चौकशी, झालेल्या नुकसानीचे
पंचनामे, शेतकऱ्यांचे पीक विमा दावे काढण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड या कंपनीची
शासनातर्फे नियुक्ती झाली होती. तथापि, शेतकऱ्यांना प्रतिसाद न देणे, दिरंगाई
करणे, मनुष्यबळाची उपलब्धता नसणे, अशा कारणास्तव जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी या
कंपनीस काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी शिफारस शासनाकडे केली आहे.
दरम्यान
शेतकऱ्यांनी आपले विमा दावे सोमवार दि.५ जून पर्यंत सादर करावे,असे आवाहनही
करण्यात आले आहे.
दर सोमवारी होणारी बैठक आता ५ जून रोजी
दरम्यान
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात दर सोमवारी बैठक
घेण्यात येते. ही बैठक येते दोन सोमवार म्हणजेच दि.२२ व दि.२९ रोजी काही अपरिहार्य
कारणास्तव होणार नसून आता ही बैठक सोमवार दि.५ जून पासून नियमित वेळेवर सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होईल,असे कळविण्यात
आले आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा