विशेष लेखः सोयाबीन पेरणीची अष्टसुत्री



अकोला जिल्ह्यात कापूस, सोयाबीन व तूर ही प्रमुख खरिपाची पिके असून त्यांचे लागवड क्षेत्र व उत्पादकताही जास्त आहे. आगामी खरीप हंगामात एकूण ४ लाख ६९ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, कापूस, तूर, मूग उडीद, इत्तर पिक पेरणीचे नियोजन आहे. त्यापैकी सोयाबीनचे २ लाख ३२ हजार हेक्टर, कापसाचे १ लाख ६० हजार हेक्टर, तूर ५७ हजार ५०० हेक्टर, मूग १० हजार हेक्टरवर पेरणी करण्याचे नियोजन आहे. इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीनचे पेरणीचे क्षेत्र जास्त आहे. हमखास उत्पन्न व चांगला बाजार भाव यामुळे दरवर्षी सोयाबीनच्या पेऱ्यात वाढ होत आहे. सोयाबीनच्या उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. सोयाबीनसाठी घरचेच बियाणे वापरणे यामुळे खर्चात बचत होऊन उत्पादन वाढते. अर्थात त्यासाठी शेतकऱ्यांनी घरच्या बियाण्यावर प्रक्रिया करण्याची शास्त्रीय पद्धत अवलंबिल्यास हमखास उत्पन्न मिळू शकते. त्यासाठी कृषी विभागाने अष्टसुत्री दिली आहे, तिचा अवलंब शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे.

घरगुती सोयाबीनची प्रतवार

अ) स्पायरल सेपरेटवर - बहुतेक शेतकरी सोयाबीनचे घरचे बियाणे पेरणी करीता वापरत असतांना प्रतवारी न करता वापरतात. त्यामुळे पेरणीसाठी सरसकट ३५ ते ४० किलो बियाणे वापरतात.  सोयाबीन पीक स्वयंपरागसिंचीत असल्याने या पिकाचे सुधारीत वाणाचा वापर केला जातो. सर्वसाधारण ६७ टक्के बियाणे दरवर्षी घरगुती निवडपद्धतीने राखुन ठेवुन ती पेरणी केली जाते. घरगुती राखुन ठेवलेले बियाणे वापर करतांना स्पायरल सेपरेटरमधून प्रतवारी करुन घ्यावी. प्रतवारी केलेले बियाण्याची  घरगुती पद्धतीने उगवण क्षमता तपासावी. उगवणक्षमता ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास शिफारशीनुसार हेक्टरी ६५ किलो बियाणे वापरावे, ७० टक्के पेक्षा कमी उगवणक्षमता असल्यास प्रति १ टक्का उगवणीकरीता अर्धा किलो प्रमाणे बियाण्याची मात्रा वाढवावी. प्रतवारी करुनही उगवणक्षमता ६० टक्के पेक्षाकमी असल्यास असे सोयाबीन बियाणे पेरणीकरता वापरु नये.

ब) बियाणे प्रक्रिया केंद्रावरुन प्रतवारी करुन घेणे : ज्या शेतकऱ्याकडे घरगुती पद्धतीने राखुन ठेवलेल्या  सोयाबीनची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे अशा शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील बियाणे उत्पादन कंपन्या व बिजोत्पादन करणाऱ्या खाजगी कंपन्यांच्या बीजप्रक्रिया केंद्रावर घरगुती बियाण्याची प्रतवारी करुन घ्यावी. 

घरच्या घरी बियाणे उगवणक्षमता तपासणीची पद्धत

वापरण्यात येणाऱ्या संपूर्ण बियाणाचे प्रतिनिधीत्व करतील असे 100 दाणे घ्यावे व ते ओल्या गोणपाट, टिशुपेपर, वर्तमान पत्र कागद, जर्मिनेटींग पेपर, ट्रे व मातीमध्ये या कोणत्याही पद्धतीने  बियाणे ओळीत ठेवा, ते गुंडाळा आणि 4 ते 5 दिवस सावलीत ठेवावे. पाच दिवसानंतर अंकुरित बियाणे मोजा आणि अंकुरित बियांची  टक्केवारी काढा.

बीज प्रक्रिया

बीज प्रक्रिया करुन पेरणी केल्यामुळे रोपांची उगवण चांगली होते. रोपाची जोमदार वाढ होते व सुरुवातीच्या काळात कीड व रोगापासून पिकाचे संरक्षण होते. तसेच जैविक बीज प्रक्रिया केल्यामुळे व्दिदल पिकांचे मुळावरील गाठीमुळे हवेतील नत्र स्थिरीकरण होते. तसेच पिकास मुळाव्दारे घेण्याच्या स्थितीत स्फुरद उपलब्ध करुन देते.

रासायनिक बीज प्रक्रिया : पेरणीपुर्वी दोन महिन्याअगोदर किंवा एक दिवस पेरणी पुर्वी कार्बोक्झीन ३७.५ टक्के ३ ग्रॅम + थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे. खोडमाशीकरिता थायोमेथोक्झाम ३० टक्के एफ.एस. ६ मी.ली./किलो रस शोषणाऱ्या किडीसाठी इमीडाक्लोप्रीड १.५ मी.ली./किलो बियाणे लावावे. बाजारात बुरशीनाशक+किटकनाशक एकाच वेष्टनात उपलब्ध झालेली आहेत ते ३ ते ५मी.ली./किलो वापरावे. जसे. वार्डन, इलेक्ट्रॉन व कॅसकेड. 

जैविक बीज प्रक्रिया : रायझोबीयम+पी.एस.बी.+के.एम.बी. २५ ग्रॅम किंवा ६ मिली/किलो किंवा लिक्वीड कॉन्सर्सिया ६ मिली/किलो व ट्रायकोडर्मा ५ ग्रॅक किंवा ६ मिली/किलो पेरणीपुर्वी दोन तास अगोदर करुन बियाणे सावलीत सुकवुन पेरणी करावी.

वाणाची निवड

शक्यतो दहा वर्षाच्या आतील वाणाची निवड करावी. (जेएस-२०२९ (२०१४), एमएयुएस- १५८(२०१०), एएमएस -१००१(२०१८), एएमएस-एमबी-५-१८ (२०१९), एमएयुएस-१६२ (२०१४), जेएस-२०३४ (२०१४), जेएस – २०९८ (२०१९), एमएसीएस -११८८ (२०१३), एनआरसी -८६ (२०१५), एमएयुएस – ६१२ (२०१६) फुले अग्रणी (केडीएस -३४४) (२०१३), फुले संगम (केडीएस-७२६) (२०१६), फुले किमया(केडीएस-७५३) (२०१७), एएमएस-१००-३९(२०१९), केडीएस-९९२(२०२०)

पेरणीच्या पद्धती

 सलग दोन ते तीन दिवसात ७५ ते १०० मिमी पाऊस अथवा चार ते सहा इंच जमीनीत ओल उपलब्ध झाल्यानंतर व वाफसा आल्यानंतरच पेरणी करावी. 

पेरणीची खोली

 रब्बीमध्ये पेरणी करण्याकरीता बियाणे खोल ओलीत पडावे म्हणून पेरणी यंत्राच्या नळ्या उलट्या म्हणजेच खताची नळी बियाण्याला व बियाण्याची खताला जोडतात.  खरीपाची पेरणी करण्यापुर्वी पेरणी यंत्राच्या नळ्या योग्य प्रकारे जोडणी करुन घ्यावे. पेरणी यंत्राचे फण सारखे खोलीवर लागावे, याकरीता समपातळीत करुन घ्यावे. पेरणी करीत असतांना बियाणे ३ ते ५ सेमी खोलीवर पडत असल्याची खात्री करावी. रासायनिक खत खालच्या बाजुला व त्यावर ५ सेमी अंतरावर बियाणे पेरणी होत असल्याची खात्री करावी.  ट्रॅक्टरव्दारे पेरणी करतांना ट्रॅक्टर सेंकड लो गेअरमध्ये १.९६० आर.पी.एम. ठेऊन प्रति तास ५ किमी या वेगाने चालविल्यास साधारण ४५ ते ५२ मिनीटात एक एकर पेरणी करावी. रात्रीच्या वेळी पेरणी करुन नये. शक्यतोवर बीबीएफ यंत्राव्दारे पेरणी करावी. साध्या पेरणी यंत्राने  पेरणी करतांना प्रत्येक सात तासानंतर ६० सेमी रुंदीची खोल मृत सरी पाडावी. 

रासायनिक खताची मात्रा

प्रति एकर शिफारशीनुसार उपलब्ध खताचे प्रमाण :

१. युरिया १६ किलो +१०:२६:२६  -४६ किलो + सिंगल सुपर फॉस्पेट ७५ किलो.

२. युरिया ६.५२ + १२:३२:१६ -७५ किलो + गंधक २० किलो.

३. युरिया २६ किलो + सिंगल सुपर फॉस्पेट १५० किलो + म्युरेट ऑफ पोटॅश २० किलो.

४. युरिया ५.७३ किलो + डी. ए. पी. ५२.१६ किलो + म्युरेट ऑफ पोटॅश २० किलो + गंधक २० किलो.

५. १५:१५:१५-८० किलो + सिंगल सुपर फॉस्पेट ७५ किलो.

६. १८:१८:१० – ६६.४० किलो + सिंगल सुपर फॉस्पेट ७५ किलो + म्युरेट ऑफ पोटॅश ८.९३ किलो.

वरील पैकी एक खत + गंधक एकरी ८ किलो पेरणी करताना द्यावी. पेरणीनंतर सोयाबीन पिकास युरिया खताची दुसरी मात्रा देण्यात येऊ नये. काही भागात सोयाबीन पिकाची वाढ व्हावी म्हणून पेरणीपासून एक महिन्यानंतर युरिया खताचा वापर करतात. त्यामुळे पिकाची कायिक वाढ होऊन उत्पादनात घट येते. त्यामुळे पेरणीनंतर युरिया खताचा वापर टाळावा. रासायनिक खताबरोबर एकरी ४ किलो फोरेट किंवा १० किलो कॉर्बो फ्युरॉन दिल्यास सोयाबीनवरील महत्वाच्या किडी खोडमाशी व चक्रीभुंग्याचे व्यवस्थापन करण्यात मदत होते.

तणनाशकाचा वापर

 जमीनीची सेंद्रीय कर्ब व प्रति ग्रॅम जिवाणुची उपलब्धता लक्षात घेता शक्यतो तणनाशकाचा वापर टाळून भौतिक पद्धतीने तण नियंत्रण करावे. अपवादात्मक परिस्थितीतच तणनाशकाचा वापर करावा. पेरणी लगेचच फ्लुमीऑक्झीन ५० टक्के एस.सी. ५ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.  किंवा पेरणीनंतर १५ ते २० दिवसाच्या दरम्यान तण दोन ते तिन पानावर असतांना इमॅझीथायपर २० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा क्विझॅलो्रपॉप पी इथाईल ५ टक्के इ.सी. २० मीली प्रती १० लिटर पाणी. यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची फवारणी नॅपसॅक पंपाव्दारेच करावी. तणनाशकाच्या फवारणी करीता गढुळ पाण्याचा वापर करु नये. तणनाशकाची फवारणी करतांना वापरण्यात येणारे पाणी आम्लधर्मी असावे. त्याकरिता लिटमस पेपरव्दारे तपासणी करावी. पाणी अल्कधर्मी असल्यास सिट्रीक ॲसिड मिसळुन पाणी आम्लधर्मी करुन वापरल्यास तणाचे प्रभावी नियंत्रण होते. फवारणीकरीत असतांना जमीनीत पुरसा ओलावा असणे आवश्यक आहे.

-         माहिती स्त्रोतः कृषी विभाग.

-         संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ