‘धन्य जाहले पूर्णब्रह्म!’ शहिदांच्या कुटुंबियांसमवेत पालकमंत्र्यांचे स्नेहभोजन; आली कृतज्ञतेची प्रचिती!

 







अकोला,दि.१५(जिमाका)- ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असे म्हणतात, पण आज ह्या पूर्णब्रह्मालाही कृतज्ञता वाटावी,अशी प्रचिती देणारे औचित्य पालकमंत्री बच्चू कडू यांनी साधले. निमित्त होते शहिद कुटुंबियांसमवेत स्नेह भोजनाचे! शहिदांचे वारस, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, पुत्र, कन्या यांच्या ‘वदनी’ गेलेला हा पूर्णब्रह्माचा ‘कवळ’ स्वतःलाच धन्य मानत होता!

स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहिदांच्या कुटूंबियांसमवेत पालकमंत्र्यांनी स्नेह भोजनाचे आयोजन केले. त्यात स्वतः पालकमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या हातांनी  जेवण वाढलं. जिल्हाधिकारी, प्रशासनातले इतर अधिकारीही वाढपी झाले. थाटामाटात म्हणावा असा हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. खरंतर शहिदांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्याची ही एक संधी होती, आणि स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाचे हे औचित्य अधिक औचित्यपूर्ण झालं.

अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू शहिदांच्या कुटुंबियांच्या विषयावर प्राधान्याने काम करीत आहेत. त्यांना शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांबाबत  ते अधिक जागरुक आहेत. प्रशासनातल्या प्रत्येकाने असं जागरुक असावं, याबद्दलही ते आग्रही आहेत. यासाठी जिल्ह्यातील २८ शहिद कुटुंबियांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेटी त्यांनी घेतल्या. त्यांची अडीअडचण जाणून घेतली. त्यापैकी अनेकांचे  प्रश्न मार्गीही लागलेत.

पालकमंत्र्यांच्या या संवेदनशीलतेची प्रचिती आजच्या शहीद कुटुंबियांसमवेत स्नेहभोजन या कार्यक्रमातून आली. वीरमातांचे पाय स्वतः पालकमंत्र्यांनी धुतले. या स्नेहभोजनाचा थाट मोठा होता. प्रत्येक वीर माता, वीर पिता , वीर पुत्र, वीर कन्या, वीर पत्नी ह्यांना सन्मानाने बसविण्यात आले.  स्वतः पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रशासनातले उच्च अधिकारी वाढपी झाले. पालकमंत्र्यांनी आपल्या मनोगतात सांगितले त्याप्रमाणे ‘ तुमच्या सोबत जेवणाची संधी मिळाली, हे आमचे भाग्य’, त्यामुळे  सर्वांचे सर्व अभिनिवेश गळून पडले. स्वतः ‘पूर्णब्रह्म’ असलेले ‘अन्न’ ही देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या  शहिदांच्या वारसांच्या, अशा वीर पुत्रांना जन्म देणाऱ्या माता पितांच्या तोंडी जाऊन धन्य होत होते.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह अनेक  अधिकारीही उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ