पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केली नुकसानग्रस्‍त शेतीची पाहणी · मदतीसाठी शासन कटीबध्द · अवकाळी पावसामुळे 100 टक्के शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान · सरसकट नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव पाठविण्याबाबत निर्देश








अकोला, दि. 2 (जिमाका)-   जिल्ह्यात 19 ते 29 ऑक्टोंबर या कालावधीत अवकाळी पावसामुळे 100 टक्के शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान झाले असल्याचे निर्देशनात आले आहेत. सरसकट नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधीताना दिले. जिल्हाधिकारी यांच्या दालनात अवकाळी पाऊस व शेतीपिकांच्या नुकसानीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपसंचालक कृषी अरुण वाघमारे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोंखडे, विमा कंपणीचे जिल्हा समन्वय डि.एस. सपकाळ, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला असेल अशा शेतकऱ्यांना त्याचा अर्ज असो अथवा नसो विमा योजनेचा सरसकट लाभ देण्यात यावा, असे निर्देश विमा कंपणीच्या अधिकाऱ्यांना दिले. विमा कंपणीकडून मदत प्राप्त झाल्यास ती अविलंब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी यासाठी पुर्व तयारी व अधिक मार्गदर्शन आताच विमा कंपणीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मागवून घ्यावे व शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.
 जिल्हयातील 2 लक्ष 66 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला असून आतापर्यंत 48 हजार शेतकऱ्यांचे पिक विमा नुकसान अर्ज प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांनी पिक विमा नुकसान अर्ज कृषी सहाय्यक किवा तहसिलदाराकडे जमा करावेत असे आवाहन पालकमंत्री यांनी केले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा  व तालुकास्तरावर मदत कक्ष तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी  जिल्हा प्रशासनाला दिले. विविध सेवा सहकारी संस्थाच्या 412 गट सचिवामार्फत पिक विमा नुकसान अर्ज जमा करण्यात येत आहे. तरी विमा धारक शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील गट सचिवाची संपर्क साधावा असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.  अवकाळी पावसामुळे आलेल्या आपत्तीमध्ये जिल्हयात 6 व्यक्तीना मृत्यू आला असून त्यापैकी 5 व्यक्तीना शासकीय मदत देण्यात आली आहे. बाळापूर तालुक्यातील 1 व्यक्ती पुरात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीच्या कुटूंबाला त्वरीत मदत देण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिलेत.

       पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केली नुकसानग्रस्‍त शेतीची पाहणी

ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत करांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी  पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज शनिवारी (दि. 2) केली. शेतकऱ्यांच्या शेतात भेट देऊन पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे सांत्वन केले. शासनाकडून सात बारा असलेल्या शेतकऱ्यांना सर्वेक्षण करुन मदत करण्यात येईल असे आश्वासन देवून त्यांना आश्वत केले.  यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, कृषी उपसंचालक अरुण वाघमारे तसेच इतर अधिकारी होते.
सर्वप्रथम पालकमंत्री डॉ. पाटील यांनी कान्हेरी सरप येथील सोयाबीनच्या शेताला भेट दिली. शेतात सोंगुण ठेवलेल्या सोयाबीनचे पीकांच्या गंजीला अवकाळी पावसामुळे खराब होवून सोयाबिन कुजून गेले आहे तसेच त्यांना कोंब फुटले आहेत. शेतातील ज्वारीच्या कणसाना बुर्शी लागून खराब झाले आहे.आळंदा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनला कोंब फुटले  आहे. असे निदर्शनात आले असून कापशी तलाव येथील कपाशीच्या पीकांचे अति पावसामुळे बोंड खराब झाल्यामुळे नुकसान झालेले आहे. बाळापूर तालुक्यातील गायगाव,  निमकर्दा, मोरगांव सादीजन तसेच तेल्हारा तालुक्यातील दहीगाव या गावाच्या शेत शिवाराला भेट देवून पालकमंत्री डॉ. पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी  केली. जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, ज्वारी व तूर  पिकांचे अतोनात नुकसान झाले असून सरसकट नुकसान भरपाई चे प्रस्ताव  पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत शासन कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ