प्रशासन आणि सार्वजनिक मंडळांची बैठक गणेशोत्सवःसद्भाव, सुरक्षा आणि सामंजस्याचा









अकोला,दि. २४(जिमाका)- यंदाचा गणेशोत्सव साजरा करतांना सद्भाव, सुरक्षा आणि परस्पर सांमजस्य जोपासून उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा, असा सूर जिल्हा प्रशासन व सार्वजनिक गणेशोस्तव मंडळांच्या संयुक्त बैठकीत निनादला.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग यांच्या संयुक्त बैठकीत आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन भवनात ही बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी  निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,सहा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर,  उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, डॉ. रामेश्वर पुरी, अभयसिंह मोहिते, महावितरण अधीक्षक अभियंता पवनकुमार खचोट, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहा सराफ, अन्य विभागांचे प्रमुख अधिकारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीचे अध्यक्ष ॲड, मोतिसिंग मोहता, सचिव सिद्धार्थ शर्मा  तसेच मंडळांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

बैठकीत प्रारंभी विविध विभागांमार्फत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती देण्यात आली. महानगरपालिकेने मंडळांना द्यावयाच्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरु करावी. मिरवणूक मार्गांवरील खड्डे बुजवावे. पोलीस विभागाने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कार्यवाही करावी. गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदुषण  होऊ नये यासाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करण्याबाबत नियमांचे पालन व्हावे. रात्री १० वा. नंतर ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धक वापरता येणार नाही. तथापि, या कालावधीत गणेशोस्तवाचा  दुसरा दिवस(गुरुवार दि.१ सप्टेंबर), पाचवा दिवस(रविवार दि.४ सप्टेंबर),  गौरी विसर्जन(सोमवार दि.५ सप्टेंबर) अनंत चतुर्दशी  (शुक्रवार दि.९ सप्टेंबर) हे चार दिवस  ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरण्यास रात्री १२ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी खडसे यांनी दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष ॲड. मोहता व सचिव सिद्धार्थ शर्मा  तसेच विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही काही सुचना केल्या.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर म्हणाले की, पोलीस विभाग कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कटीबद्ध आहे. सार्वजनिक मंडळांनी आपल्यास्तरावर स्वयंसेवकांची सुरक्षा व्यवस्था ठेवावी. सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे.पोलीसांतर्फे दामिनी पथक हे सज्ज असेल. तसेच नियमित बंदोबस्त असेलच.सुरक्षेची उपाययोजना म्हणून सार्वजनिक मंडळांच्या मंडपाची बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी करण्यात येईल, त्यासाठी मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी गणेशोत्सवात सुधारणांना वाव असावा. शक्यतोवर पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा. कायद्याचे व नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीचे प्रास्ताविक, सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ