‘लम्पि स्किन डिसीज’ची १८ गावांमध्ये ३४१ जनावरांना लागण:पशुपालकांमध्ये जनजागृतीवर भर; प्रभावित क्षेत्रात जनावरांचे लसीकरण सुरु

 













अकोला दि.२९(जिमाका)- जिल्ह्यात १८ गावांमध्ये ३४१ जनावरांना ‘लम्पि स्किन डिसीज’ या संसर्गजन्य आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्हा पशुसंवर्धन यंत्रणा सज्ज असून प्रभावित क्षेत्रातील (बाधीत जनावरांच्या ५ किमी परिघातील) जनावरांचे लसीकरण सुरु झाले आहे. प्रभावित क्षेत्रातील जनावरांची संख्या २२ हजार २९१ असून जिल्ह्यात ३५ हजार लसींचा साठी उपलब्ध आहे. पुढील शक्यता लक्षात घेता लसींचा आणखी साठा मागविण्यात आला असून पशुपालकांनी आपल्या जनावरांवर लक्ष ठेवावी  जनावरांस संसर्ग झाल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.

 या संदर्भात पशुसंवर्धन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात मौजे निपाना ता. अकोला, तसेच अकोट व तेल्हारा तालुक्यातील जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १८ गावांमध्ये ३४१ जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. अशा बाधित जनावरे आढळलेल्या गावांच्या पाच किमी परिघातील प्रभावित क्षेत्रात ५७ गावे असून  अशा गावांमध्ये २२ हजार २१९ जनावरे आहेत. सद्यस्थितीत प्रभावित क्षेत्रातील या सर्व जनावरांना  लसीकरण सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या ३५ हजार लसींचा साठा उपलब्ध आहे. आतापर्यंत ४ हजार ९३९ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून १४१ जनावरे उपचारानंतर बरेही झाले आहेत, अशी माहितीही पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.

दरम्यान आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी  निपाणा ता. अकोला येथे प्रत्यक्ष भेट देऊन जनावरांची पाहणी केली व पशुपालकांचा मेळावा घेऊन त्यांना मार्गदर्शनही केले. जिल्ह्यातील अन्य भागातही पशु वैद्यकीय अधिकारी ग्रामीण भागात क्षेत्रभेटी देत आहेत व जनावरांची पाहणी तपासणी करुन पशुपालकांमध्ये जनजागृती करीत आहेत. दरम्यान शासनाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यात बाधीत जनावरे आढळलेल्या ठिकाणापासून पाच किमी परिघाच्या क्षेत्रात गोट पॉक्स लसीकरण सुरु करण्यात आले आहे. गोठे निर्जंतूकीकरण (सोडियम हापोक्लोराईड फवारणी करुन) करण्यात येत असून गोचिड, गोमाशी, चिलटे निर्मूलनाचीही उपाययोजना करण्यात येत आहे.

लम्पि स्किन डिसीज लक्षणेः- लम्पि स्किन डिसीज हा आजार बाह्य किटकाद्वारे पसरतो. संसर्ग झाल्यास जनावरांना मध्यम स्वरुपाचा ताप २ ते ३  दिवस असतो. काही वेळा १०५ ते १०६ फॅ. इतकाही ताप असू शकतो.  ताप येऊन गेल्यानंतर शरीरावर २ ते ५ से.मी. आकाराच्या गाठी येतात. तोंडात, घशात व श्वसन नलिकेत  पुरळ येतात.  तोंडातील पुरळामुळे जनावराची लाळ गळत राहते. जनावरात अशक्तपणा, भूक कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे दिसून आल्यास पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा व तात्काळ जनावरास उपचार द्यावे.

पशुपालकांनी घाबरुन जाऊ नये

या आजाराने जनावरे दगावण्याचे प्रमाण हे १ ते ५ टक्के इतके आहे, त्यामुळे पशुपालकांनी घाबरुन जाऊ नये. हा आजार बाह्य किटकांद्वारे पसरत असल्याने गोठ्यांमध्ये व बाधीत जनावरावर योग्य त्या प्रमाणात औषध फवारणी करावी. बाधीत जनावरांला अन्य जनावरांपासून वेगळे ठेवावे. बाधीत जनावरांच्या गोठ्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड २ टक्के या औषधाची फवारणी करावी. पशुपालकांनी अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी १९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ