बालविवाहमुक्त जिल्ह्याचे उद्दिष्ट एकाच आठवड्यात पाच बालविवाह रोखले

 

 

बालविवाहमुक्त जिल्ह्याचे उद्दिष्ट

एकाच आठवड्यात पाच बालविवाह रोखले 

अकोला, दि. 21 : बालविवाहमुक्त जिल्ह्याचे उद्दिष्ट ठेवून प्रशासनाने बालविवाह प्रतिबंधक कार्यवाहीला गती दिली आहे. एकाच आठवड्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी होऊ घातलेले ५ बालविवाह रोखण्यास महिला व बालविकास प्रशासनाला यश आले आहे.

 

बालविवाह ही सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या गंभीर समस्या असून, तिचे निर्मूलन करण्यासाठी सर्व स्तरांवर एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले होते. त्यानुसार संबंधित यंत्रणांनी सतर्क राहत कार्यवाहीला वेग दिला आहे.  बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणा, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये प्रभावी समन्वय ठेवण्यावर भर देण्यात येत आहे.

 

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विवाह सोहळ्यांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होते. हे लक्षात घेऊन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने सर्व धर्मगुरुंची परिषद घेऊन संवाद व आवाहनही करण्यात आले.

भारतातील बालविवाहाचे प्रमाण 2030 पर्यंत 5 टक्क्यांहून कमी करण्यासाठी देशभर बालविवाह प्रतिबंधक मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागाबरोबरच चाईल्ड हेल्पलाईन लाईन 1098, बालविवाहमुक्त भारत अभियान, जिल्हा बालकल्याण समिती, ॲसेस टु जस्टीस प्रकल्प, जिल्हा बालसंरक्षण कक्ष, आय. एस. डब्ल्यू. एस. यांच्या समन्वयाने कार्यवाही होत आहे.

 

जिल्ह्यात अकोट तालुक्यात 1, तेल्हारा तालुक्यात 1, बार्शीटाकळी तालुक्यात 1, बाळापूर तालुक्यात 1 व अकोला तालुक्यातील 1 असे पाच बालविवाह एकाच आठवड्यात रोखण्यात आले. अकोट तालुक्यात एका 16 वर्षीय बालिकेचा विवाह 29 वर्षीय व्यक्तीसह होत असल्याची माहिती मिळताच पथकाने तत्काळ जाऊन हा बालविवाह रोखला.

कार्यवाहीत कुटुंबियांचे, पाहुण्यांचे समुपदेशन करताना त्यांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 ची माहिती देण्यात येते. लग्नाचे वय पूर्ण झाल्याशिवाय मुलाचा किंवा मुलीचा विवाह करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेतले जाते व बालकल्याण समितीसमोर उपस्थित राहण्याची नोटीस बजावली जाते, असे जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे यांनी सांगितले.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांच्या मार्गदर्शनात बालकल्याण समितीच्या अनिता गुरव, राजेश देशमुख, प्रांजली जयस्वाल, शीला तोष्णीवाल, विनय दांदळे, सुनील लाडुलकर, सुनील सरकटे, जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील सरकटे, सपना गजभिये, विशाल गजभिये, पूजा पवार, राजश्री कीर्तीवर, पूजा मनवर यांच्यासह बालकल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, ग्राम बाल संरक्षण समिती, ॲसेस टु जस्टीस प्रकल्प, आय. एस. डब्ल्यू एस., एन्करेज एज्युकेशन फाउंडेशन आदी कार्यरत आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा