श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे सर्वांगीण विकास बाल संस्कार शिबिराचा समारोप नव्या पिढीला संस्कार देण्यासाठी शिबिरासारखे उपक्रम महत्वपूर्ण – पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

 











अकोला, दि. ३० : मोबाईल आणि नवमाध्यमांच्या या युगात नवी पिढी अध्ययन, जीवनमूल्ये व संस्कार यापासून दुरावता कामा नये. मुलांना ही शिकवण व संस्कार देण्यासाठी सर्वांगीण विकास शिबिरासारखे उपक्रम महत्त्वपूर्ण आहेत, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले.


अकोट येथील श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांगीण विकास बाल संस्कार शिबिराचा समारोप पालकमंत्री श्री. फुंडकर यांच्या उपस्थितीत झाला. श्री क्षेत्र आळंदी (देवाची) येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या उपशाखेचे उद्घाटनही यावेळी झाले. आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार अमोल मिटकरी, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदिपान महाराज शिंदे, ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष वासुदेवराव महाराज महल्ले, प्रकाश महाराज जवंजाळ, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर आदी यावेळी उपस्थित होते.


पालकमंत्री श्री. फुंडकर म्हणाले की, पाठांतर, ओव्या, अध्याय, बालमनावर सुसंस्कार करणाऱ्या पारंपरिक अध्ययन पद्धती यांची जपणूक संस्थेतर्फे बाल संस्कार शिबिराच्या माध्यमातून होत आहे. नवमाध्यमांच्या काळात नवी पिढीला आपल्या महान परंपरा व प्राचीन वारसा, मूल्ये यांची शिकवण देण्यासाठी संस्थेकडून प्रयत्न होत आहेत. संस्थेच्या कार्यासाठी व पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य शासन स्तरावरून मिळवून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.
 
प्रारंभी पालकमंत्री श्री. फुंडकर यांनी श्री वासुदेव महाराज यांच्या पादुका व प्रतिमेचे दर्शन घेतले. संस्थेच्या भोजनगृहाचे भूमिपूजन यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गीतेतील श्लोकांचे सादरीकरण केले. शिबिरातील गुणवंतांना यावेळी गौरविण्यात आले.
०००

--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा