महाराष्ट्राचा ६६ वा स्थापनादिन उत्साहात साजरा राज्यात सर्वसमावेशक विकासप्रक्रियेला गती - पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

 















अकोला, दि. १ : सुमारे साडेसहा दशकांच्या वाटचालीत महाराष्ट्राने प्रत्येक टप्प्यावर प्रगती करत राज्याने प्रदीर्घ काळापासून स्वत:चे अग्रस्थान अढळ ठेवले आहे. राज्य शासनाने नवनव्या लोकहितकारी धोरण व निर्णयांनी विकासप्रक्रिया अधिक गतिमान व सर्वसमावेशक झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे केले. 


महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे मुख्य ध्वजारोहण समारंभ झाला. राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि प मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह,  महापालिका आयुक्त सुनील लहाने, ’महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर आदी उपस्थित होते. 


प्रारंभी राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजारोहण, पथसंचलन असा कार्यक्रम यावेळी झाला. पालकमंत्र्यांनी जीपमधून फेरी मारून पथकांचे निरीक्षण केले, तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना भेटून शुभेच्छा दिल्या. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस, ग्रामविकास, क्रीडा आदी विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी गौरविण्यात आले.

पालकमंत्री ॲड. फुंडकर यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की,  प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातकलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला. सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून प्रत्येक योजना अधिकाधिक लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात येत आहे. 

जिल्ह्यात शेतकरी बांधवांसाठी अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत  1 लाख 2 हजार 176 पात्र शेतकऱ्यांना 643 कोटी 36 लक्ष रू. इतका लाभ देण्यात आला आहे. तसेच प्रोत्साहनपर लाभ योजनेत 20 हजार 512 लाभार्थ्यांना 89 कोटी 49 लक्ष इतकी रक्कम वितरित करण्यात आली. गत खरीप व रब्बी हंगामातील पीक कर्ज, कृषी सहकारी संस्थांचे संगणकीकरण, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाह्य, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, मनरेगा आदी विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती त्यांनी दिली. 

ते म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत 4 लक्ष 37 हजार 626 महिलांना लाभ मिळाला. अंत्योदय अन्न योजनेच्या 45 हजार 664 शिधापत्रिकाधारकांना साड्यांचे वितरण करण्यात आले. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ उपक्रमातील उत्कृष्ट कामगिरीमुळे जिल्ह्याला बालस्नेही पुरस्कार मिळाला आहे.  राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासित कार्यक्रमात जिल्ह्यातील 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे.  

कामगारहितासाठी शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांचाही त्यांना भाषणात उल्लेख केला. ते म्हणाले की, केंद्र शासनाचे नवे कामगार धोरण व कायदे लागू करताना महाराष्ट्रात कामगार हिताची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. राज्यातील कामगार कायद्यात सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यात येत आहे.   असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र निधी व सुधारणा योजना, माथाडी कामगार व खासगी सुरक्षा रक्षक कायद्यात सुधारणा वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी दरवर्षी निवृत्ती वेतन,  त्याचप्रमाणे, महिला व बालकामगारांबाबत विशेष दक्षता आदी निर्णय घेतले आहेत. 

विविध क्षेत्रांतील कामगारांशी संबंधित योजना एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याचे नियोजन राज्य शासनाचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे, डिजीलॉकरद्वारे डिजीटल प्रमाणपत्र मिळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बालकामगारमुक्तीसाठी वेळोवेळी तपासण्यांना वेग देण्यात आला आहे.

         जिल्ह्यात पायाभूत सुविधांची उभारणीही गतीने होत आहे. अकोल्यात 15 कोटी निधीतून सांस्कृतिक भवन निर्माण होत असून, लवकरच ते रसिकांसाठी खुले होईल. अकोल्याची सांस्कृतिक समृद्धी वाढविणारे हे भवन ठरेल. 5 कोटी निधीतून ऑलिंपिक दर्जाच्या जलतरण तलावाचे काम, नाविन्यपूर्ण योजनेत 35 लक्ष रूपये निधीतून सिंथेटीक बॉस्केटबॉल मैदानाचे काम प्रगतीपथावर आहे. बॉक्सिंग खेळाचे राज्यस्तरीय हाय परफॉर्मन्स सेंटर अकोल्याला मिळाले असून 2028 च्या ऑलिंपिक स्पर्धेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील खेळाडूंना त्याचा लाभ मिळेल. 

ग्रामीण गृहनिर्माण योजनेत 100 दिवसांचे उद्दिष्ट पूर्ण करून अकोला जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. उद्दिष्टाच्या 183 टक्के काम करून साडेचार हजारावर घरकुले पूर्ण केली आहेत. जिल्ह्यात प्रत्येक घटकासाठी अनेक योजना व्यापकपणे राबवल्या जात आहेत. विकासाची ही प्रक्रिया अधिकाधिक पुढे जाण्यासाठी  आपण सर्वजण एक होऊन तसा संकल्प करूया, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात विविध पोलीस व सुरक्षा दलांनी पथसंचलन केले. शहरातील अनेक मान्यवर नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा