संकटाच्या काळात एकत्र येऊन काम करण्याची गरज-पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे आयएमएच्या बैठकीत प्रतिपादन


अकोला,दि.९(जिमाका)- कोरोना चे संक्रमण हा अभूतपुर्ण अशा संकटाचा काळ आहे. हे संकट वैश्विक आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी संक्रमण रोखण्यासाठी प्रशासन जितके महत्त्वपूर्ण आहे तितकेच वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर्सही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या संकटकाळात आपण सारे एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी  आज येथे केले. येथील इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या  सभागृहात आज पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी सर्व सभासदांना संबोधित केले.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण तसेच आयएमए चे पदाधिकारी उपस्थित होते.
ना. कडू याप्रसंगी म्हणाले की, वैद्यकीय उपचार हा या संकटाला थोपवण्यातला महत्त्वाचा भाग आहे. ते काम डॉक्टरच करु शकतात. प्रशासन आणि शासकीय आरोग्य यंत्रणा ही  हे संकट थोपविण्यासाठी सर्वात पुढे आहे. मात्र यात आपल्या सारख्या वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांची, त्यांच्या अनुभवाची जोड मिळाली की मग या संकटाचा मुकाबला अधिक जोमाने करता येईल,असे प्रतिपादन करुन त्यांनी डॉक्टर आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे आवाहन केले. यावेळी आयएमएचे  अध्यक्ष डॉ. कमलेश लढ्ढा,  डॉ. अनूप कोठारी, डॉ. अमोल केळकर,  डॉ. पराग डोईफोडे तसेच अन्य सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ