कुणीही पायी जाणार नाही याची खबरदारी घ्या- विभागीय आयुक्त पियुष सिंह यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश


अकोला,दि.१५(जिमाका)-  स्थलांतरीत मजूरांची त्यांच्या राज्यात परतण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येत आहेच. तथापि ज्यांना आपापल्या राज्यात जायचे आहे त्यांच्यापैकी कुणी पायी जाणार नाही याची खबरदारी घ्या, पायी जाणारे मजुर दिसले तर त्यांना थांबवून  त्यांच्या पुढच्या प्रवासाची सोय करा, असे निर्देश  विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी जिल्हाप्रशासनाला दिले.
 विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषद सीईओ डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसुले,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण,  डॉ. अपुर्व पावडे,  उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,  उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, उपजिल्हाधिकारी  भूसंपादन सदाशिव शेलार, जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे, सीसीआयचे  अजयकुमार  आदी उपस्थित होते.
 यावेळी आयुक्तांनी जिल्ह्यातील व शहरातील  प्रतिबंधात्मक क्षेत्रांची माहिती घेऊन त्यातील जेथे २८ दिवसांपेक्षा अधिक कालावधीत कोणीही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नसल्यास  त्या क्षेत्रास प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून वगळा अशी सुचना केली.  ज्या भागात संसर्गाचे प्रमाण जास्त आहे तेथे संपर्क तपासणी करुन आरोग्य तपासण्या करा. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व चाचणी सुविधांबाबत त्यांनी माहिती घेतली.
कापूस खरेदीचा वेग वाढवा
जिल्ह्यात सुरु असलेल्या सीसीआय मार्फत कापूस खरेदी संदर्भात ग्रेडरची संख़्या वाढवून  जिल्ह्यातील कापूस खरेदीची प्रक्रिया पुर्ण करा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात सीसीआय २९ हजार ४६५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून आतापर्यंत  २३४९ शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी झाला आहे. तेव्हा ग्रेडरचे मनुष्यबळ वाढवून उर्वरित काम दुप्पट वेगाने पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
स्थलांतरीत मजुरांच्या प्रवासाचा आढावा
जिल्ह्यातून परराज्यात जाऊ इच्छिणाऱ्या परप्रांतीय स्थलांतरीत मजूरांच्या प्रवास व्यवस्थेबाबत त्यांनी आढावा घेतला. यावेळी माहिती देण्यात आली की,  अकोला जिल्ह्यातून राज्यातील अन्य जिल्ह्यात जाणाऱ्या मजुरांची संख़्या ३७९ आहे.  परप्रांतीय मजुर ४८३१ होते त्यापैकी आतापर्यंत २२११ जणांना रवाना करण्यात आले असून २६२० जणांच्या जाण्याचे नियोजन सुरु आहे. तर अकोला जिल्ह्यातील लोक जे परप्रांतात अडकले आहेत त्यांची संख़्या१३७१ असून या सर्व जणांना जिल्हा प्रशासनाने त्यांनी मागणी केल्यानुसार ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले आहेत. यावेळी आयुक्तांनी सांगितले की, जिल्ह्यातून कुणीही मजुरांचे गट पायी जात असतील तर त्यांना थांबवून त्यांची ज्या प्रमाणे विभागस्तरावरुन रेल्वे वा त्यांच्या राज्याच्या सिमेपर्यंत बस सेवेद्वारे जाण्याची व्यवस्था करावी.
होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप
येथील रेडक्रॉस सोसायटीमार्फत प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य संलग्न कार्यालये येथे  मोफत वाटप करण्यात आले. त्यासाठीचे औषधे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांचेकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी रेडक्रॉसचे अध्यक्ष प्रभतसिंग बच्छेर, डॉ, मालोकार व होमिओपॅथी डॉक्टर संदीप चव्हाण आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ