स्वतः पालकमंत्रीच शेतकऱ्याला निरोप देतात तेव्हा... मुर्तिजापुर येथील कापूस खरेदी केंद्र कार्यान्वित
अकोला,दि.१२(जिमाका)- ‘हॅलो, मी बच्चू कडू बोलतोय, भाऊराव फाटे
बोलतात का? आपण कापुस खरेदीसाठी नोंदणी केली आहे. तर आपण आता उद्या या सकाळी नऊ
वाजता, ओम जिनिंग फॅक्टरीला...’ दस्तूरखुद्द पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनीच शेतकऱ्यांना
फोन करुन कापूस खरेदीसाठी येण्याचा निरोप दिला, आणि सीसीआय मार्फत मुर्तिजापुर
येथे सुरु झालेल्या कापूस खरेदी केंद्रावरील कापूस खरेदीची प्रक्रिया कार्यान्वित
झाली.
येथील मुर्तिजापुर तालुक्यासाठी सीसीआय चे कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यास मान्यता
देण्यात आली असून तेथील ओम जिनिंग फॅक्टरी येथे कापूस खरेदी प्रक्रियेसाठी तयारी
सज्ज करण्यात आली आहे. आज प्रशासनाने केलेल्या या खरेदी तयारीची पाहणीही राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महिला व बालविकास इतर
मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती,भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग
कल्याण, शालेय शिक्षण, महिला व
बालविकास कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ
बच्चू कडू यांनी आज मुर्तिजापूर
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कापूस खरेदी केंद्रास भेट दिली. यावेळी सहकारी
संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे, उपविभागीय
अधिकारी मुर्तिजापूर अभयसिंह मोहिते,
तालुका खरेदी विक्री संघाचे सचिव रितेश मडगे, सहाय्यक
जितेंद्र कांबे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माहिती देण्यात आली की
मुर्तिजापुर येथील कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्री साठी ८५८ शेतकऱ्यांनी कालपासून
(दि.११) नोंदणी केली आहे. या ठिकाणी ओम जिनिंग फॅक्टरी येथे कापूस खरेदी केंद्र
सुरु करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची शक्यता लक्षात घेता
शेतकऱ्यांना आधी फोन वरुन नोंदणी करता येणार आहे. त्यानुसारच शेतकऱ्यांना फोन करुन
आपला कापूस खरेदी केंद्रावर आणण्याबाबत सुचना दिली जाणार आहे. यावेळी स्वतः पालकमंत्र्यांनीच
ही सुचना शेतकऱ्यांना देऊन खरेदी प्रक्रियेचा निरोप दिला.
त्यानंतर कृषि उत्पन्न बाजार समिती मुर्तिजापुर आवारातील नाफेडच्या तुर व
हरभरा खरेदी केंद्रास पालकमंत्री ना. कडू यांनी भेट दिली. यावेळी
व्यवस्थापक धिरज मुळे यांनी आतापर्यंत शासनाकडून ९८८ शेतकऱ्यांची १४ हजार ५०० क्विंटल तुर
व ३०५ शेतकऱ्यांचा सहा हजार ५०० क्विंटल
हरभरा खरेदी करण्यात आला असल्याची
माहिती दिली. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा
त्रास शेतमाल विक्रीस आणतांना होवू नये, असे निर्देश पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी दिलेत. तत्पुर्वी
पालकमंत्री यांनी ओम जिनिंग फॅक्टरीला भेट देवून कापूस खरेदीसाठी करण्यात आलेल्या
तयारीची पाहणी केली व योग्य सुचना
संबंधीतांना दिल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा