पालकमंत्र्यांनी साधला नगरसेवकांशी संवाद


अकोला,दि.१४(जिमाका)-  अकोला महानगरपालिका क्षेत्रात  कोरोना बाधितांची संख्या वाढत असतांना या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांसंदर्भात  आज राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी  अकोला शहरातील नगरसेवकांशी संवाद साधला. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीस आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित  होते.
 यावेळी उपस्थित नगरसेवकांनी आपापल्या भागातील नागरिकांना व विशेषतः प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना येत असलेल्या समस्यांबाबत आपले विचार मांडले.  यात दाट लोक वस्ती व श्रमिक , रोजंदारी मजूर यांच्या वसाहतीतील प्रश्न मांडण्यात आले. प्रतिबंधात्मक क्षेत्रात द्यावयाच्या आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता या सुविधांसोबतच  नागरिकांना लागणाऱ्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी वस्तूंचा पुरवठा याबाबत चर्चा करण्यात आली.
 याबाबत मार्गदर्शन करतांना पालकमंत्री ना. कडू म्हणाले की, या आपत्तीचा सामना करण्यासाठी ही बंधनं लावण्यात आली आहेत. त्यामुळे ही पाळण्यात आपलं हित आहे. हे नागरिकांना समजावून सांगणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याची सर्व व्यवस्था प्रशासन करीत आहे. या रोगाचा फैलाव त्याचा प्रसार होण्याची पद्धती व शक्यता यासर्व गोष्टींचा विचार करता केवळ परस्परांमध्ये अंतर राखणे, बंधने पाळून किमान संपर्क राखणे याबाबत सवयी अंगिकाराव्या लागतील, असे आवाहन त्यांनी केले.
 यावेळी नगरसेवकांनी उपचार व रुग्णसेवेबाबत केलेल्या मागण्यांची पूर्तता लगेचच केली जाईल असे त्यांनी सभागृहाला आश्वस्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ