"समान संधी केंद्र" स्थापन करा; सामाजिक न्याय विभागाचे आवाहन
अकोला दि.20(जिमाका)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात
त्या महाविद्यालयातील किमान एक प्राध्यापक व सहायक म्हणून काही विद्यार्थी यांची मदत
घेऊन महाविद्यालयातच "समान संधी केंद्र" सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले
होते. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयाने समान संधी केंद्र स्थापन करुन उपक्रमाचा अहवाल
सादर करणे आवश्यक आहे. तरी ज्या महाविद्यालयाने समान संधी केंद्र स्थापन केले नाही
त्या महाविद्यालयानी केंद्र स्थापन करुन उपक्रमाचा अहवाल तातडीने सादर करावा, असे आवाहन
समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले.
महाविद्यालयातील
मागासवर्गीय मुला-मुंलीना शिष्यवृत्ती, फ्रिशिप व इतर शासनाच्या योजना व स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन सोबतच उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन
करणे तसेच संवाद अभियान-युवा संवाद यासारखे कार्यक्रम सुरु करण्याकरीता आता महाविद्यालयामध्येच
विद्यार्थ्यासाठी "समान संधी केंद्र" स्थापन करण्याचे सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य विभागांनी निर्देशित केले आहे. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयातील
किमान एक प्राध्यापक व सहायक म्हणून काही विद्यार्थ्यांची मदत घेऊन महाविद्यालयातच
"समान संधी केंद्र" स्थापन करावे. याकरीता वेळोवेळी सूचनाही देण्यात आले
आहे. सद्यास्थितीत जिल्ह्यात 311 महाविद्यालयापैकी 236 महाविद्यालयानेच समान संधी केंद्राची
स्थापना केली असून अद्याप 75 महाविद्यालयामध्ये स्थापना झाली नसल्याचे निर्देशनात आले
आहे. याबाबत ऑनलाईन बैठकीत संबधीत महाविद्यालयानी तातडीने समान संधी केंद्र स्थापन
करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.
"समान
संधी केंद्र"च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित
करणे, रोजगार प्राप्तीसाठी किंवा उद्योजकता, व्यावसायिक, कौशल्य शिक्षण आदि महत्वाकांक्षी
उपक्रम राबविले जाणार आहे. तरी महाविद्यालयानी समान संधी केंद्र तातडीने स्थापन करुन
तसा अहवाल समाज कल्याण कार्यालयात सादर करावा. अन्यथा मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता
शैक्षणिक उपक्रम राबविण्यामध्ये महाविद्यालय उदासीन असल्याचे गृहीत धरुन कारवाई करणेबाबातचा
प्रस्ताव पालकविभागास पाठविण्यात येईल यांची संबधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी
नोंद घ्यावी, असे पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा