जिल्हा नियोजन समिती बैठक ; आरोग्य, शिक्षण क्षेत्रातील सुविधा विकासासाठी एकत्र यावे- पालकमंत्री बच्चू कडू

 





          अकोला,दि.6(जिमाका)- जिल्ह्यातील ग्रामिण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा विकास करणे तसेच आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सर्व सदस्यांनी एकत्रित काम करावे. आरोग्य आणि शिक्षणाच्या विकासासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून एकत्र येऊ या, असे आवाहन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्व आमदार महोदय व सदस्यांना केले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हा नियोजन भवनात पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधान परिषद सदस्य आ. डॉ. रणजित पाटील, आ. अमोल मिटकरी, आ. किरण सरनाईक, आ. वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपवनसंरक्षक के. आर. अर्जूना, उपायुक्त नियोजन किरण जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, सहायक नियोजन अधिकारी कैलास देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे तसेच सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत प्रारंभी गत बैठकीचे इतिवृत्त व अनुपालन अहवालावर चर्चा झाली.  तसे सन 2021-22 च्या मार्च अखेरील खर्चास पुनर्विनियोजनासह मान्यता प्रदान करण्यात आली.  तसेच जिल्हा वार्षिक योजना 2022-23 अंतर्गत झालेल्या खर्चास (25 मे 2022 अखेर) मान्यता प्रदान करण्यात आली.  सन 2021-22 मध्ये जिल्ह्यात 80 पाणंद रस्त्यांचे काम महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अभिसरण योजनेतून हाती घेण्यात आले, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 9 कोटी 27 लक्ष रुपयांच्या निधी मागणी करण्याचा प्रस्ताव सादर करणे, 2020-21 मधील 99 पाणंद रस्त्यांसाठी वाढीव खर्च 2 कोटी 50 लक्ष रुपये  मंजूरीसाठी विषयावर चर्चा करण्यात आली.तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक 2 साठी 13 कोटी 80 लक्ष रुपये उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक योजनेतून सात टक्के संभाव्य बचतीतून पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करुन देण्यासही मान्यता देण्यात आली. तसेच जिल्ह्यात तालुकानिहाय नविन आरोग्य संस्था स्थापन करण्यासाठी बृहत आराखड्यास जिल्हा नियोजन समितीची मान्यता देण्यात आली.

यावेळी झालेल्या चर्चेत  आमदार महोदयांनी काही मुद्दे उपस्थित केले. ते याप्रमाणे-

आ. डॉ. रणजित पाटील- डॉ. पाटील यांनी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात स्थापण्यात आलेले ऑक्सिजन प्लांट सुरु असल्याबाबत एक  चाचणी घेण्यात यावी. जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा नादुरुस्त झाल्या आहेत, त्याशाळांची दुरुस्ती प्राधान्याने घ्यावी. जिल्हा परिषद शाळांना वीज जोडण्या देण्याची कार्यवाही पूर्ण करावी. आरोग्य विभागात होत असलेल्या पदभरती प्रक्रियेबाबत चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच पूर्णा नदीत अमरावती जिल्ह्यातील सांडपाणी व उद्योगाचे सांडपाणी येऊन निर्माण झालेल्या जलप्रदूषणाच्या समस्येकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आ. प्रकाश भारसाकळे- आ. भारसाकळे यांनी  जिल्ह्यात असलेली पाणीटंचाईवर उपाययोजना कराव्या अशी मागणी केली. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला हप्ता अनेक लाभार्थ्यांना न मिळाल्याने होत असलेल्या अडचणींचा मुद्दा उपस्थित केला. तसेच पाणंद रस्ते विकासाचा पुढचा टप्पाही सुरु करावा अशी सुचना त्यांनी केली.

आ. अमोल मिटकरी- आ. मिटकरी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिव्यांगांना लागणारे साहित्याचे वाटप व्हावे. खतांची साठेबाजी रोखण्यासाठी उपाययोजना व्हावी.  पिककर्जाची शेतकऱ्यांना उपलब्धता करुन देणे,  जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात नालेसफाई, पुल दुरुस्ती याबाबत पावसाळा सुरु होण्याच्या आत उपाययोजना व्हावी. तसेच जिल्ह्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे  यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त  उभारावयाच्या स्मारकास जागा उपलब्ध व्हावी, अशी मागणी केली.

आ. गोवर्धन शर्मा- आ.शर्मा यांनी मागील वर्षी अतिवृष्टीत बाधीत झालेल्या कुटुंबांना मदत निधी मिळण्याबाबत उपाययोजना व्हावी अशी मागणी केली.

आ. रणधीर सावरकर- आ. सावरकर यांनी जिल्ह्यात हरभरा खरेदी, तसेच गतवर्षीच्या पूरग्रस्तांना मिळणारी मदत, तसेच पूर नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत आपले मत मांडले. तसेच खतांचे आवंटन प्राप्त होण्यासाठी रेल्वेस्थानकावर खतसाठा तात्काळ वाहतुक होणे व तेथे तोवर पावसात तो सुरक्षित राहणे याबाबत आपली भुमिका मांडली.

आ. हरिष पिंपळे- आ. पिंपळे यांनी  जिल्ह्यात बंद पडलेली हरभरा खरेदी सुरु करण्यासाठी उपाययोजना व्हावी. 108 रुग्णवाहिकांची सेवा मिळण्यात रुग्णांना होत असलेला त्रास, तसेच जिल्ह्यात अग्निशमन सेवांबाबत असलेल्या समस्या याबाबत प्रश्न उपस्थित केले.

आ. नितीन देशमुख- आ. देशमुख यांनी जिल्ह्यात आगामी पावसाच्या दृष्टीने करावयाची पूर्व तयारी, जिल्ह्यात शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा होण्यासाठी पुरेशी उपाययोजना असावी. जिल्ह्यातील खाजगी कोचिंग क्लासेस संदर्भातील मुद्यावरही त्यांनी चर्चा घडवून आणली.

आमदार महोदयांनी तसेच अन्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर पालकमंत्री कडू यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरु करण्यासंदर्भात लवकरच (दि.11 किंवा 12 )मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे बैठक होऊन त्यात निर्णय होईल. जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळांच्या दुरुस्ती वा बांधकामासाठी देण्यात येणारा निधी हा त्या त्या शाळेच्या दुरुस्तीचा प्राधान्यक्रम ठरवून देण्यात येईल. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून शिक्षण आरोग्य सुविधांच्या विकासाला सर्व सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. ग्रामिण भागात अग्निशमन सुविधा उपलब्धतेसाठी बाजार समित्यांना अग्निशमन बंब उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले. पूर्णा नदीत अमरावती जिल्ह्यातून येत असलेल्या प्रदूषित पाण्यासंदर्भात अमरावती येथे बैठक घेऊन उपाययोजना करण्याबाबत पालकमंत्र्यांनी सभागृहाला आश्वस्त केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ