‘हर घर तिरंगा’अभियानात स्वयंसेवी संस्थांनी सहभाग द्यावा -निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांचे आवाहन
अकोला दि.१८(जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि.११ ते १७ ऑगस्ट २०२२ दरम्यान ‘हर घर तिरंगा’, हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले असून यात अकोला जिल्ह्यातील विविध सामाजिक - स्वयंसेवी संस्थांनीही सहभागी व्हावे,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी आज येथे केले.
या संदर्भात नियोजन भवनात स्वयंसेवी संस्थांची बैठक बोलावण्यात आली होती. या
बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे, उप विभागीय अधिकारी अकोला डॉ.
निलेश अपार, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, मुकेश चव्हाण, बाबासाहेब गाढवे, तसेच
स्वयंसेवी संस्थांपैकी जिल्हा बार असोसिएशनचे ॲड. चंद्रकांत वानखडे, जनसेवा बिल्डिंग
व बांधकाम असोसिएशन, फुटपाथ व फेरी विक्रेता संघटनेचे घनश्याम भटकर, तरंग फाऊंडेशन, अकोला एसपीसीए (प्राणी क्लेष
प्रतिबंधक समिती) इ. संघटनांचे व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यासंदर्भात
केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सुचनांची माहिती देण्यात आली. त्यानुसार,
दि.११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत नागरिक,
शासकीय- निम शासकीय आस्थापना, शैक्षणिक संस्था इ. ठिकाणी स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज उभारावयाचा आहे. यात नागरिकांनी
स्वेच्छेने सहभागी व्हावे यासाठी जनजागृती करण्यात येणार असून शाळा, महाविद्यालये,
राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, युवक मंडळे, सेवाभावी संस्था यांचे
सहकार्य घेण्यात येणार आहे. यात विविध
संस्थांनी सहभागी व्हावे, आपले योगदान द्यावे, आपल्या मार्फत हे अभियान अधिकाधिक
लोकांपर्यंत पोहोचवावे,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा