पर्जन्यमानः १३१ घरांचे अंशतः नुकसान
अकोला दि.१९(जिमाका)- जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे १३१ घरांचे अंशतः नुकसान झाले असून एक घर पूर्णतः नुकसानग्रस्त झाले आहे. मदत व बचाव कार्य सुरु असून प्रशासनाचे पंचनामे करणे, नुकसानीच्या नोंदी घेणे आदी कामे सुरु आहेत.
यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ३७.९ मि.मी
पावसाची नोंद झाली आहे. चोहोट्टा बाजार येथे
६६.५ मि.मी., कुटासा ६६ मि.मी अशा दोन मंडळात सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद झाली
आहे. तर अकोला तालुक्यात दोन, अकोट तालुक्यात ४२, तेल्हारा तालुक्यात १७,
मुर्तिजापूर तालुक्यात ५, बाळापूर तालुक्यात ६०, पातूर तालुक्यात ५ घरांचे अंशतः
नुकसान झाले आहे तर अकोट तालुक्यात एका घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे.
दरम्यान पुर्णा नदीच्या पुरामुळे
अकोला अकोट मार्ग बंद आहे. देवरी-अंदुरा-शेगाव मार्ग बंद आहे. तर तेल्हारा
तालुक्यात पुर्णा, गौतमा, विद्रुपा
नद्यांच्या पुरामुळे नेर, पिवंदळ, सांगवी, उमरी या गावांना जाणारे रस्ते बंद आहेत.
दरम्यान काल बंद झालेले अकोला म्हैसांग दर्यापूर, तसेच अकोला बाळापुर मार्ग सुरु झाले
आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.
वान धरणात ६५.६१ टक्के जलसाठा झाला
असून सध्या वान धरणातून १२५.३० क्युसेक पाण्याचा
विसर्ग सुरु आहे. पाणी सोडल्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात
आला आहे.
००००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा