बालविवाह मुक्ती रथाद्वारे ३०० गावांमध्ये जनजागृती
बालविवाह मुक्ती रथाद्वारे ३०० गावांमध्ये जनजागृती
अकोला, दि. १० : बालविवाह मुक्ती रथाद्वारे एक महिना 3 हजार 750 कि.मी.
प्रवास करून ३०० गावांत जनजागृती करण्यात आली.
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे इंडियन सोशल वेलफेयर सोसायटी
व जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रनच्या मदतीने १०० दिवसांची सघन जागरूकता मोहिम राबविण्यात
आली. देशभर राबविण्यात आलेल्या या मोहिमेत अकोला जिल्ह्यातही शहरे व गावांमध्ये पोहोचून विविध क्षेत्रांतील नागरिकांना
सहभागी करून घेण्यात आले.
बालविवाह हे केवळ सामाजिक दुष्कर्म नाही तर लग्नाच्या नावाखाली मुलांवर
बलात्कार करणे आहे. हा एक गुन्हा आहे आणि कायद्याने दंडनीय आहे. बालविवाह कोणत्याही
मुलीच्या जीवनाची भरभराटीची क्षमता नष्ट करतो आणि तिला कुपोषण, निरक्षरता आणि गरिबीच्या
दुष्टचक्रात ढकलतो. त्यामुळे ही मोहिम व्यापक स्वरूपात राबविण्यात आली. सरकार, प्रशासन
आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागाने ही मोहीम व्यापक जनचळवळीत रूपांतरित झाली, असे सोसायटीचे
संचालक अशोक बेलेकर यांनी सांगितले.
मोहिमेत ठिकठिकाणी बालविवाह निर्मूलनासाठी कायदा, संरक्षण आणि जबाबदारीची
प्रतिज्ञा घेण्यात आली. शैक्षणिक संस्था, धार्मिक नेते यांनाही सहभागी करून घेण्यात
आले. लग्नसोहळ्यात सेवा देणारे आचारी, सजावटकार, मंगल कार्यालय मालक, वाजंत्री आदींशीही
संपर्क साधून बालविवाहात त्यांच्या सेवा देऊ नयेत अशी विनंती करण्यात आली.
०००

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा