जिल्हाधिका-यांकडून नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी नुकसानग्रस्त क्षेत्राच्या पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार




जिल्हाधिका-यांकडून नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी

नुकसानग्रस्त क्षेत्राच्या पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा

-          जिल्हाधिकारी अजित कुंभार

 

अकोला, दि. ३० : अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे पुर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी अकोला तालुक्यातील दहिगाव, रामगाव, म्हैसांग या भागात भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, कृषी उपसंचालक विलास वाशीमकर, तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरूणकर आदी यावेळी उपस्‍थित होते.

रामगाव येथे पाऊस व साचलेल्या पाण्यामुळे पिकाचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे, दहिगाव, म्हैसांग या भागातील शिवाराचीही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. वेचणी न झालेला कापूस ओला होणे, कापसाबरोबरच हरभरा, तूर पिकाचे या भागात नुकसान झाल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले.

यंत्रणेने नुकसानग्रस्त क्षेत्राची संपूर्ण पाहणी करून व शेतकरी बांधवांकडून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन परिपूर्ण नोंदी घ्याव्यात. पंचनाम्याची कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. यावेळी गोपाल दोड,  बाळकृष्ण गावंडे, मुकुंद गावंडे, देवराव गावंडे, विनोद टेके, देवराव बापूंना टेके, शंकर सुलताने व इतर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने पंचनाम्याची कार्यवाही होत आहे. अद्यापपर्यंत माहितीनुसार तेल्हारा तालुक्यात ३२ हे., अकोला तालुक्यात ७ हजार ९५१ हे., पातूर तालुक्यात २ हजार ४८२ हे., बार्शिटाकळी तालुक्यात ३ हजार ५४९ हे. असे एकूण १४ हजार १४ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात आली. 

०००


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ