गायी-म्हशींमधील वंध्यत्व निवारण्यासाठी अभियान

 

गायी-म्हशींमधील वंध्यत्व निवारण्यासाठी अभियान

 

अकोला, दि. २८  : शेतकरी, पशुपालक यांच्याकडील गायी-म्हशींमध्ये उद्भवलेल्या वंध्यत्वाचे निवारण करण्यासाठी वंध्यत्व निवारण अभियानाला जिल्ह्यात  सुरुवात झाली आहे. मोहिमेत दि. १९ डिसेंबरपर्यंत गावोगाव शिबिरांद्वारे गायी-म्हशींची तपासणी व उपचाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जगदीश बुकतारे यांनी आज सांगितले.

 

राज्यातील पैदासक्षम गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाचे प्रमाण केवळ १८ टक्के आहे. राज्यात वंध्यत्व असलेल्या व माजावर न येणा-या गाई-म्हशींची संख्या सुमारे ४० लाख आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यात दुधाळ गाई-म्हशींची दूध उत्पादनक्षमता कमी आहे. त्यामुळे गावोगाव वंधत्व निवारण शिबिर घेण्यात येणार आहे.

 

शिबिरात पशुंचा आहार व स्वास्थ्य, तसेच पशुधनाची वंध्यत्व तपासणी करून निदान करण्यात येईल. जंत, गोचिड, गोमाशा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुधनावर, तसेच गोठ्यामध्ये नियमितपणे औषधी फवारणी, तसेच गाई-म्हशींमध्ये नियमित कालांतराने जंतनाशकाचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल, असे डॉ. बुकतारे यांनी सांगितले.

 

ते पुढे म्हणाले की, वंध्यत्व हे गाय, म्हैस भाकड राहण्याचे प्रमुख कारण आहे. सर्वसाधारणपणे कालवडी २५० किलो व वासरे २७५ किलो शारीरिक वजन गाठल्यानंतर पहिला माज दर्शवितात. ज्या जनावरात सलग तीन आठवडे वजनात घट दिसून येते, त्यांच्यात प्रजननाची कमतरता व वंधत्वाची बाधा आढळते. त्यामुळे जनावरांना रोज १ किलो पशुखाद्य, मुबलक हिरवा व वाळलेला चारा, मुक्तसंचार, व्यवस्थापनात व्यायम, रोज ५० ग्रॅम खनिजमिश्रण, जंतनाशके, भरपूर पाणी याचे नियोजन आवश्यक आहे.

 

तपासणीनंतर काही कमतरता आढळल्यास योग्य औषधोपचार आवश्यक असतात. गाई-म्हशी व्याल्यानंतर ९० दिवसांच्या आत माजावर येऊन गाभण राहिल्यास त्यांच्यातील दोन वेतातील काळ कमी होण्यास मदत होते, असे डॉ. बुकतारे यांनी सांगितले.

       गाई- म्हशी माजावर आल्यानंतर त्यांच्यामध्ये योग्यवेळी कृत्रिम रेतन न केल्यास जनावरांच्या दोन वेतांतील अंतर वाढणे, वर्षाला वासरू न मिळणे व खाद्यावरील खर्च होऊन पशुपालकाचे नुकसान होते. त्यामुळे याबाबत उपाययोजनेसाठी पशुपालकांनी या अभियानात जनावरांवर उपचार करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ