बालविवाह रोखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा जिल्हाधिकारी अजित कुंभार
बालविवाह रोखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा
जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. १५ : समाजात बालविवाह रोखण्यासाठी
मोठ्या प्रमाणात प्रबोधन आवश्यक आहे. जिल्ह्यात बालविवाह होऊच नयेत यासाठी
सर्वांनी सर्वंकष प्रयत्न करण्याची गरज जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी व्यक्त
केली.
महिला व बालविकास विभागातर्फे नियोजनभवनात शुक्रवारी
आयोजित बालविवाह प्रतिबंधक कार्यशाळेत ग्रामसेवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत
होते. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य अॅड. श्री. संजय सेंगर, जिल्हा
बाल संरक्षण अधिकारी दिनेश गराठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समाधान वाघ, जिल्हा
कार्यक्रम राजश्री कौलखेडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, ॲड. अनिता
गुरव, सारिका घारणीकर, राजेश देशमुख, प्रांजली जयस्वाल, ॲड. शीला तोष्णीवाल, जिल्हा
बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, काही
बालविवाह रोखण्यात आले म्हणून समाधान मानून चालणार नाही. एकही बालविवाह होऊ नये असे
प्रयत्न व्हावेत.
ग्रामसेवकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्यात नमूद बालविवाह
प्रतिबंधाविषयी त्यांचे कर्तव्य याची माहिती असणे आवश्यक आहे. त्याचे गांभीर्य
लक्षात घेऊन व्यापक प्रबोधन करावे. यापुढे बालविवाह झाल्यास संबंधितांना प्रशासकीय
कार्यवाहीस सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
ॲड. सेंगर, श्री. गराठे व मान्यवरांनी कार्यशाळेत
मार्गदर्शन केले. बालविवाहमुक्त भारत अभियानांतर्गत शपथ घेण्यात आली. श्री. पुसदकर
यांनी प्रास्ताविक केले. सतीश राठोड यांनी सूत्रसंचालन केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा