जिल्हाधिका-यांकडून विविध बाबींचा आढावा एप्रिलअखेरपर्यंत कामे पूर्ण करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. २५ : जिल्ह्यात कुठेही पाणीटंचाई उद्भवू नये यासाठी सजग राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात. या अनुषंगाने सुरू असलेली किंवा प्रस्तावित कामे एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे दिले.
जिल्ह्यातील पेयजल उपलब्धता, खरीप तयारी व इतर बाबींचा आढावा जिल्हाधिका-यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला, त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, पुढील काळात जिल्ह्यात कुठेही पाणीटंचाई उद्भवू नये यादृष्टीने आवश्यक उपाय करावेत. शहरातील जलवाहिनी, जलकुंभ व्यवस्थेत आवश्यक सुधारणा व्हाव्यात. दुरूस्ती करताना पुरवठा बंद झाल्यास नागरिकांना त्रास होतो. ते टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. प्रत्येक उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात योग्य लक्ष द्यावे व तसे अचूक नियोजन करावे.
ते पुढे म्हणाले की, खरीपासाठी शेतकरी बांधवांना बियाणे, खते आदी निविष्ठा मिळण्यासाठी पुरेसा साठा असल्याची खातरजमा करावी. शेतक-यांना कुठलाही त्रास होता कामा नये. राज्य शासनाने १०० कृती कार्यक्रम आखून दिला आहे. त्यानुसार सर्व बाबींची पूर्तता करावी. कार्यालयांत अभ्यागतांसाठी आवश्यक सुविधा उभाराव्यात. ॲग्रीस्टेक योजना, तसेच विविध योजनांचाही आढावा त्यांनी घेतला.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा