राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त व्यापक मोहिम: मंगळवारी (दि.२१) तीन लाख ६५ हजार बालकांना देणार जंतनाशक गोळ्या
अकोला, दि.१७(जिमाका)- राष्ट्रीय जंतनाशक दिना (दि.२१ सप्टेंबर) निमित्त आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात वय वर्षे एक ते १९ या वयोगटातील लाभार्थ्यांना (बालक व किशोरवयीन मुला मुली) जंतू नाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोंद असलेल्या ९३१९२ बालकांसह शाळांमध्ये नोंद असलेले विद्यार्थी व नोंद नसलेले बालके मिळून ३ लाख ६५ हजार ४६१ बालकांना जंतनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
या मोहिमेसाठी सर्वस्तरावरील यंत्रणा व आरोग्य
कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून सर्व बालकांपर्यंत जंतनाशक गोळी पोहोचवून त्यास ती खाऊ
घालावी. गोळी दिलेल्या प्रत्येक बालक लाभार्थ्याची नोंद ठेवावी,असे निर्देश निवासी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले.
यासंदर्भात आज लोकशाही सभागृहात जंतनाशक मोहिम जिल्हास्तरीय सुकाणू समितीची
बैठक पार पडली. यावेळी डॉ. मनिष शर्मा,
डॉ. विजय जाधव, डॉ. भावना डोहाळे, डॉ. जगदीश बनसोडे, डॉ. श्वेता खालफळे, डॉ. अस्मिता पाठक, पोलीस निरीक्षक गोविंद साबळे, झेड.पी. अहमद, प्रकाश गवळी आदी उपस्थित होते.
यावेळी माहिती
देण्यात आली की, जिल्ह्यात ही मोहिम ११२६ आशा सेविका, १४११ अंगणवाडी केंद्र, ११३९
शाळा, ३३३ खाजगी शाळा १२ तांत्रिक शिक्षण संस्था यांच्यामार्फत राबविण्यात येणार
आहे. या मोहिमेत अंगणवाड्यांमध्ये नोंद असलेल्या
९३१९२ बालकांसह शाळांमधील विद्यार्थी व नोंद नसलेले बालके मिळून ३ लाख ६५ हजार ४६१ बालकांना जंतनाशक गोळी
देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त वय वर्षे एक ते १९ या वयोगटातील बालकांना व
किशोरवयीन मुला मुलींना अंगणवाडी, शाळा
तसेच केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्याचा
प्रयत्न होईल. ही मोहिम राष्ट्रीय जंतनाशक दिन २१ सप्टेंबर रोजी राबविण्यात येईल.
तर दि. २८ सप्टेंबर रोजी जी बालके राहून
गेली असतील त्यांना गोळी देण्यात येईल. या मोहिमेत सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला
व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग यांचा समावेश आहे.
अशी दिली जाणार गोळी
या मोहिमेत Albendazole 400
mg ही गोळी चावून खाण्यास देण्यात येईल. त्यातही एक
ते दोन वर्षे वय असलेल्या बालकास अर्धी
गोळी (२०० मि. ग्रॅ.) पावडर करुन पाण्यात विरघळून, तर दोन ते तीन वर्षे वयाच्या
बालकास एक गोळी ( ४०० मि. ग्रॅ.) पावडर
करुन पाण्यात विरघळून देण्यात येईल. गोळी घेतांना बालकाने नाश्ता अथवा जेवण केलेले
असणे आवश्यक आहे.
लाभार्थी
संख्येनुसार आवश्यक गोळ्यांचा साठा सर्व केंद्रस्तरावर पोहोचविण्यात आला आहे.
आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांचे प्रशिक्षण झाले असून शिक्षकांनाही याबाबत सचेत करण्यात आले
आहे,अशीही माहिती यावेळी देण्यात आली.
कृमी दोष व बालके
वय वर्षे एक ते १९ या वयोगटातील २ कोटी ४१ लक्ष बालकांमध्ये आतड्यांचा कृमी दोष असल्याचा अंदाज
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. कृमी दोष हे रक्तक्षय व
कुपोषणाचे कारण असून यामुळे बालकांचे
बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटते. भारतात अशा बालकांचे प्रमाण हे ३४.४ टक्के
तर १५ ते १९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये ५६ टक्के तर मुलांमध्ये ३०
टक्के रक्तक्षयाचे प्रमाण आहे. महाराष्ट्रात मातीतून प्रसारीत होणाऱ्या कृमी
दोषाचे प्रमाण २९ टक्के आहे. कृमी दोष असलेली बालके कायम अशक्त व थकलेली असतात. त्यांचे अभ्यासात
लक्ष लागत नाही.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा