जिल्ह्यात 236 ग्रामपंचायतींची टीबीमुक्तीकडे वाटचाल ‘टीबी’चे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी शोध मोहिम व उपचारांना गती द्यावी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे निर्देश

 





जिल्ह्यात 236 ग्रामपंचायतींची टीबीमुक्तीकडे वाटचाल

‘टीबी’चे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी

शोध मोहिम व उपचारांना गती द्यावी

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे निर्देश

अकोला, दि. 20 : जिल्ह्यात 236 ग्रामपंचायतींची टीबीमुक्तीकडे वाटचाल होत आहे. क्षयरूग्णांचे प्रमाण व मृत्यू शून्यावर आणण्यासाठी शोध मोहिम व उपचारांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले.

 

जिल्हा टीबी फोरमची बैठक जिल्हाधिका-यांच्या दालनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनीष शर्मा, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. आशिष गि-हे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. निखील लहाने यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी डॉ. शर्मा यांनी क्षयरोग निर्मूलनासाठी होणा-या प्रयत्नांबाबत सादरीकरण केले.

 

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की. क्षयरोग निर्मूलन मोहिमेत टीबीमुक्त ग्रामपंचायतींना पुरस्कार दिला जातो. जिल्ह्यातील सर्व गावे टीबीमुक्त करण्याचे ध्येय ठेवून मोहिमेला गती द्यावी. प्रौढांचे बीसीजी लसीकरण ऐच्छिक आहे. तथापि, 75 हजारहून अधिक व्यक्तींनी पूर्वनोंदणी केली आहे.  त्यात सध्या 34 टक्के लसीकरण झाले आहे. हे काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी श्री. कुंभार पुढे म्हणाले की, क्षयरूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या ‘सीवायटीबी’ तपासण्या करून त्यांना आवश्यकतेनुसार उपचार मिळवून देण्यासाठी मोहिम हाती घेतली जात आहे. तालुका आरोग्य अधिका-यांनी या मोहिमेचे परिपूर्ण नियोजन व अंमलबजावणी करावी.

जिल्ह्यात डिसेंबर 2024 पर्यंत क्षयरोगाच्या 3 हजार 182 रूग्णांची नोंद झाली. त्यांच्यावर औषधोपचार मिळवून देण्यात येत आहेत. 2023 मध्ये 3 हजार रूग्ण होते. त्यापैकी 2 हजार 719 रूग्ण बरे झाले. क्षयरूग्ण तपासणीत 92 व्यक्ती एचआयव्हीबाधित असल्याचे आढळले. त्यांच्यावर औषधोपचार होत आहेत.

नि:क्षय पोषण योजनेत क्षयरूग्णांच्या खात्यात औषधोपचार सुरू असेपर्यंत डीबीटीद्वारे दरमहा एक हजार रू. जमा केले जातात. खासगी डॉक्टरांकडे उपचार घेणा-या रूग्णांनाही हा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील 2 हजार 426 रूग्णांनी घेतला.

नि:क्षयमित्र योजनेत दाते मिळवून क्षयरूग्णांना आवश्यक पोषण आहार दिला जातो. विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी पुढाकार घेऊन त्यासाठी योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र आर्य, डॉ. गजानन इंगळे, डॉ. सायली कांबळे, डॉ. विजय बडगे, डॉ. प्रवीण चव्हाण, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रकुमार सोनोने आदी उपस्थित होते. वसंत उन्हाळे, कपील होळकर, हेमंत भाकरे, उमेश पद्मने आदींनी सहकार्य केले.

 ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा