गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अपघातात अपंगत्व आल्यास अर्थसाह्य - एसएओ शंकर किरवे यांची माहिती

 

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

अपघातात अपंगत्व आल्यास अर्थसाह्य

-         एसएओ शंकर किरवे यांची माहिती

 

                            अकोला, दि. 11 : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सुधारणा करून  दि. 19 एप्रिलनुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येते. त्यानुसार अपघातात शेतक-याला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास आर्थिक मदत मिळते, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी सांगितले.

योजनेत 10 ते 75 वयोगटातील अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता वहितीधारक शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकर्‍याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतक-याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणीही एक व्यक्ति) अशा एकूण दोघांसाठी योजना राबविण्यात येत आहे.

                   विमा कंपन्या तसेच विमा सल्लागार कंपन्याकडून योजना व्यवस्थित राबविली जात नसल्यामुळे राज्य शासनाने आधीची विमा योजना बंद करून सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे. नवी योजना प्रत्येक दिवसाच्या 24  तासांसाठी लागू आहे. त्यामुळे योजनेतील पात्र व्यक्तीला केव्हाही अपघात झाला तरी मदत मिळण्यास अपात्र न ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र शासनाच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्तांसाठी चालू असलेल्या योजनेचा लाभ घेतल्यास नव्या योजनेचा लाभ मिळणार नाही.

        योजनेत अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख, अपघातामुळे दोन डोळे, दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास 2 लाख, अपघातामुळे एक डोळा आणि एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 2 लाख, तसेच अपघाताने एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख आर्थिक सहाय्य देण्यात येते. जिल्ह्यातील अपघातग्रस्त शेतकरी,  शेतक-यांचे वारसदार यांनी दि. 19 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात घटना घडलेली असेल तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. किरवे यांनी केले आहे.

 

           अपघातग्रस्त शेतक-याबाबत प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यानंतर सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित महसूल अधिकारी, पोलिस अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे पथक प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करून त्याबाबतचा अहवाल तहसिलदार यांना घटना झाल्यापासून ८ दिवसांच्या आत सादर करतील. त्यानंतर तालुका कृषि अधिकारी प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून पात्र असलेले विमा प्रस्ताव संबंधित तहसीलदार यांना सादर करतील. त्यानंतर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठकीमध्ये ३० दिवसाच्या आत संबंधित शेतकरी/शेतकरी कुटुंबाच्या वारसदारांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात येवून संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेमार्फत संबंधित अपघातग्रस्त शेतकरी/वारसदारांच्या बँक खात्यात निधी जमा करण्यात येईल.

                  योजनेत  रस्ता अपघात,रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलाईटकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या हल्ल्यात/चावण्यामुळे जखमी,मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू , दंगल, अन्य कोणताही अपघात या अपघातांचा समावेश आहे.

             त्याचप्रमाणे, योजनेत नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध,.सैन्यातील नोकरी,  जवळच्या लाभधारकाकडून खून याबाबींचा समावेश असणार नाही.

०००

                                                                

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ