गावात बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्यावी सरपंच, पोलीस पाटील व ग्रामसेवकांना जिल्हाधिका-यांची सूचना
गावात बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्यावी
सरपंच, पोलीस पाटील व ग्रामसेवकांना जिल्हाधिका-यांची सूचना
अकोला, दि. 6 : बालविवाहाच्या अनिष्ट प्रथेला आळा घालणे आवश्यक आहे. जिल्हा
बालविवाहमुक्त होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत. गावात बालविवाह होणार नाही
याची खबरदारी ग्रामसेवक, सरपंच व पोलीस पाटील यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी
अजित कुंभार यांनी केले आहे.
सखी वन स्टॉप सेंटरच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये त्यांनी विविध सूचना
केल्या. बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार ग्रामसेवक हे ग्रामीण भागासाठी बालविवाह
प्रतिबंध अधिकारी असुन, अंगणवाडी सेवीका सहायक म्हणून काम करतात. शहरी भागासाठी
बालविकास प्रकल्प अधिकारी हे बाल विवाहप्रतिबंध अधिकारी आहेत.
गावांमध्ये बालकांच्या संरक्षणासाठी ग्राम बाल संरक्षण समित्या गठित असुन
ग्राम बाल संरक्षण समितीचे सरपंच हे अध्यक्ष असून पोलीस पाटील हे त्या समितीचे
सदस्य आहेत. त्यामुळे गावात बालविवाह तसेच बालकांच्या संबंधित कोणत्याही अघटित
घटना होणार नाही याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. ग्रामसेवक, सरपंच व पोलीस पाटील
यांची भूमिका ही अतिशय महत्वपूर्ण आहे.
गुढीपाडवा सण दि.९ एप्रिल रोजी आहे. यादिवशी अनेक देवस्थानांच्या ठिकाणी
यात्रा, उत्सव असतो. त्याचप्रमाणे, विवाह सोहळेसुध्दा आयोजित केले जातात. या दिवशी
जिल्हयात कोठेही बाल विवाह होणार नाही याची दक्षता गावचे सरपंच पोलीस पाटील व
ग्रामसेवक यांनी घेणे आवश्यक आहे. बालविवाह झाल्यास विवाह सोहळ्याचे पौरोहित्य करणारे, तसेच
मंडपवाले, वाजंत्री, सहभागी मंडळी, मंगल कार्यालयमालक, वर व वधूचे आई वडील यांना
शिक्षा होऊ शकते. तसेच ग्रामसेवक, सरपंच व पोलीस पाटील यांच्यावरही कार्यवाही
प्रस्तावित केली जाऊ शकते. त्यामुळे तसे घडू नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन
करण्यात आले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा