ग्राम बाल संरक्षण समितीने बालविवाह रोखला
ग्राम बाल संरक्षण समितीने बालविवाह रोखला
अकोला, दि. 17 : ग्राम बाल संरक्षण समितीच्या जागरूकतेमुळे तेल्हारा तालुक्यातील
एका गावात होऊ घातलेला बालविवाह रोखण्यात यश आले.
जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सातत्यपूर्ण प्रयत्न
करण्यात येत आहेत. त्यासाठी सुजाण नागरिक व संघटनांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश
पुसदकर यांच्या मार्गदर्शनात
बाल संरक्षण विभागाकडून गावस्तरावर जनजागृती होत आहे.
तेल्हारा तालुक्यातील सौंदळा गावामध्ये दि. १६ मे रोजी बालविवाह असल्याची माहिती समितीला मिळाली
होती. त्यानुसार ग्राम बाल संरक्षण समिती व हिवरखेडचे पोलिस निरीक्षक, तसेच संबंधित
गावातील कर्मचारी यांनी संबंधित ठिकाणी भेट दिली. मुलीच्या जन्मतारखेची पडताळणी
केली असता मुलगी अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी दोन्ही कुटुंबांची भेट घेऊन बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 बाबत
माहिती देण्यात आली. अठरा वर्ष पुर्ण झाल्याशिवाय मुलीचे लग्न करणार नसल्याचे
हमीपत्र त्यांचेकडून लिहुन घेण्यात आले आहे. बालविवाहामुळे मुलींच्या आरोग्यावर
होणारे दुष्परिणाम याबाबतही माहिती देण्यात आली.
बालविवाह ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असून बालविवाहाला प्रतिबंधासाठी जिल्हा
बालविवाहमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावपातळीवर कार्यरत ग्राम बाल संरक्षण समितीमार्फत
माहिती मिळाल्यास तत्काळ दखल घेउन बालविवाह थांबवणे शक्य होते. तरी सर्व सुजाण नागरिक, सामाजिक संघटना यांनी
बालविवाह होत असल्याचे कळताच १०९८ चाईल्ड लाईन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, तसेच
जिल्हा कार्यालयाला संपर्क करण्याचे आवाहन श्री. पुसदकर यांनी केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा