राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतक-यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 






अकोला, दि. २९ : अद्ययावत तंत्रज्ञान व संशोधनाचा शेतकरी समृद्ध होण्यासाठी कसा उपयोग होईल, यादृष्टीने कृषी विद्यापीठाने चारभिंतीच्या पलीकडे जाऊन काम करावे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, तसेच विदर्भातील शेतक-यांसाठी नवसंजीवनी ठरावी, असे संशोधन, तंत्रज्ञान विकसित करावे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.  


कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, महोत्सव- ‘अॅग्रोटेक प्रदर्शन २०२३’ चा  समारोप पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, वसंत खंडेलवाल, अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक संदीप घुगे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, 'महाबीज'चे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे आदी उपस्थित होते. 


पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, शेतीत उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खत, औषधे वापरावी लागतात. दुसरीकडे अशा वापराचे दुष्परिणामही मानवी आरोग्यावर होत आहेत. अशा परिस्थितीत विद्यापीठाने शेतक-याचे उत्पन्नही वाढेल व अतिरसायनांचा दुष्परिणामही टळेल, यादृष्टीने संशोधन निर्माण केले पाहिजे. कृषी अर्थशास्त्र लक्षात घेऊन, तसेच वास्तव परिस्थितीचा अभ्यास करून प्रभावी उपाय सुचवावेत. कृषी विज्ञान केंद्र, संशोधन केंद्रांच्या माध्यमातून तंत्रज्ञान, संशोधन शेतक-यांपर्यंत पोहोचवावे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्यातील दुग्धोत्पादन कमी आहे. ते वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत.

कृषी विद्यापीठाच्या मागणीनुसार कृषी पर्यटनासाठी ११ कोटी निधी दोन टप्प्यात जिल्हा नियोजन निधीतून देण्यात येईल. त्याचप्रमाणे, स्पर्धा परीक्षा फोरमसाठीही सहकार्य केले जाईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.  यावेळी पालकमंत्र्यांनी कृषी प्रदर्शनातील विविध कक्षांना भेट देऊन वाण, उत्पादन यांची माहिती जाणून घेतली.  

प्रारंभी पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कुलगुरू डॉ. गडाख यांनी प्रास्ताविक केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ