महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानाचा शुभारंभ
अकोला, दि १०: लोकाभिमुख व पारदर्शी प्रशासनाची दिशा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन सुरू करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचे कार्य अखंडपणे होईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
मुर्तीजापुर तालुक्यातील लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
आमदार रणधीर सावरकर, हरीश पिंपळे ,वसंत खंडेलवाल,माजी आमदार बळीराम सिरस्कार,लाखपूरी सरपंच राजू कैथवास, मुर्तिजापूर नगराध्यक्ष हर्षल साबळे,जिल्हाधिकारी वर्षा मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे,उपजिल्हाधिकारी महसूल निखिल खेमनार,जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख भारती खंडेलवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुरलीधर इंगळे,उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार,तहसीलदार शिल्पा बोबडे आदी उपस्थित होते
श्री.बावनकुळे म्हणाले की, महाराजस्व अभियान शिबिराच्या माध्यमातून एकाच छताखाली शासनाच्या विविध योजना उपलब्ध करून देण्यात आल्या असून याचा प्रत्येकाने लाभ घेतला पाहिजे.अकोला जिल्ह्यात भूमी अभिलेख विभागाच्या मदतीसाठी 100 खाजगी सर्व्हेअर नियुक्त करण्यात येणार आहे. यामुळे शेती प्लॉट मोजणी जलद गतीने होणार आहे.मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेत रस्ते टप्प्याटप्याने पूर्ण होणार असून दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना थेट शेतीच्या बांधापर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.पट्टेवाटपाचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला असून त्याची नोंदणी केवळ 1 हजार रुपयात केली जाईल.
शेती मोजणी प्रक्रिया जलद गतीने करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पोट विषयाची मोजणी सुद्धा केवळ २०० रुपयांची फी भरून केली जाईल अशी व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणार असून येत्या दोन वर्षात शेती मोजणीचा अर्ज केल्यानंतर पंधरा दिवस ते एक महिन्याच्या आत शेती मोजणी प्रक्रिया पूर्ण व्हावी या उद्देशाने प्रशासन प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन श्री.बावनकुळे यांनी केले.
श्री. सावरकर म्हणाले की,तुकडे बंदी कायद्यात झालेल्या सुधारणांमुळे आता गुंठेवारी व लहान भूखंडाच्या मालकी हक्कातील अडथळे दूर झाले असून गतिमान प्रशासनामुळे हे शक्य झाले आहे.
श्री. पिंपळे म्हणाले की,झोपडपट्टी पुनर्वसन आणि 'सर्वांसाठी घरे' ते स्वप्न महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नातून पूर्ण होत असून मालकी हक्काचे पट्टे वाटप व त्याची नोंदणी करण्याबाबत सुद्धा महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला असल्याने हा ऐतिहासिक निर्णय आहे.
नागरिकांना सर्व योजनांची माहिती सेवा सुविधा एका छताखाली उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षेश्वर महादेव संस्थान येथे दर्शन घेतले तसेच लाखपुरी येथे रस्त्याचे लोकार्पण केले.
०००


.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा