बालसंगोपन योजनेबाबत भूलथापांना बळी पडू नये
महिला व बालविकास अधिका-यांचे आवाहन
अकोला, दि. 9 : क्रांतिज्योती
सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचे अर्ज महिला व बालविकास कार्यालयात विनामूल्य
मिळतात. तथापि, काही व्यक्ती हे अर्ज विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
नागरिकांनी अशा व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा महिला व
बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे.
बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण नियमानुसार अनाथ निराश्रित, निराधार,
बेघर संरक्षण निवा-याची गरज असणारी बालके, कुमारी मातेचे पाल्य, अपंग बालके,
कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांचे पाल्य, विधवा महिलांचे पाल्य, दोन्ही पालक अपंग
असलेली बालके, एकल पालक, घटस्फोट, पालक विभक्तीकरण, परित्याग, दुर्धर आजारग्रस्त
पालकांचे पाल्य यांच्यासाठी ही योजना राबवली जाते.
काही समाजकंटकांकडून या योजनेच्या अर्जाचे मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन विक्री
होत असल्याचे आढळले आहे. अशा लोकांच्या भुल थापांना बळी पडू नये व लाभ मिळण्यासाठी
किंवा कागदपत्रांसाठी कोणत्याही प्रकारचे पैसे देऊ नयेत. अर्जाकरिता पैशाची मागणी
कुणी केल्यास कार्यालयाला माहिती देण्यात यावी. नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे
आवाहन श्री. पुसदकर यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा