भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा लोकहितकारी योजनांच्या व्यापक अंमलबजावणीमुळे सर्वसमावेशक विकास - पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर














 

भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

लोकहितकारी योजनांच्या व्यापक

अंमलबजावणीमुळे सर्वसमावेशक विकास

-        पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

अकोला, दि. १५ : विज्ञान, तंत्रज्ञान, डिजिटल क्रांती, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी संधी आणि आत्मनिर्भरतेच्या क्षेत्रात देशाने मोठी झेप घेतली आहे. विकासाच्या या प्रवासात महाराष्ट्र अग्रस्थानी असून, दूरदर्शी नेतृत्व आणि लोकहितकारी योजनांच्या व्यापक अंमलबजावणीमुळे राज्याची सर्वसमावेशक विकासाकडे वाटचाल होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे केले.

 

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय समारंभात राष्ट्रध्वजारोहण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि. प. मुख्य कार्यकारी अनय नावंदर, पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, मनपा आयुक्त सुनील लहाने व इतर सर्व यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे कुटुंबिय, वीरमाता व वीरपत्नी, विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.  

पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्राच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, डिजिटल क्रांती, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी संधी आणि आत्मनिर्भरतेच्या क्षेत्रात देशाने मोठी झेप घेतली आहे. महाराष्ट्रही विकासाच्या या प्रवासात अग्रस्थानी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे राज्याच्या विकासाला सकारात्मक दिशा मिळत आहे.

ते पुढे म्हणाले की, देशाच्या विकासप्रक्रियेत विविध क्षेत्रांबरोबरच, येथील कष्टकरी शेतकरी, ग्रामीण भाग आणि मातीत राबणाऱ्या सामान्य माणसाचे योगदानही महत्वपूर्ण आहे. याच भावनेतून राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांना लाभ वितरण सुरू झाले असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. कर्जमुक्तांना नव्याने खरीप पीककर्ज वाटपही सुरू आहे.  

खरीप हंगामात यंदा १ हजार ३२० कोटी कर्जवितरणाचे उद्दिष्ट असून, कर्जवितरण गतीने सुरू आहे. राज्य व केंद्राच्या कृषी यांत्रिकीकरण योजना,  ‘मनरेगा’, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना,  प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आदी विविध योजनांच्या अंमलबजावणीचाही त्यांनी भाषणात उल्लेख केला.

अकोला येथे केंद्रीय विद्यालयाची स्थापना झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या ई-भूमिती प्रणाली या डिजीटल उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावरील 'स्कॉच पुरस्कार' मिळाला आहे. जलद आणि नागरिकाभिमुख प्रशासन घडविण्याच्या प्रयत्नांना राष्ट्रीय पातळीवर मिळालेली ही पावती आहे. त्याचप्रमाणे, ई-कोतवालबुक या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या प्रशासकीय इतिहासाचे डिजिटल जतन करण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतले आहे.

अकोला जिल्हा पोलीस दल ‘डायल ११२’मध्ये, तसेच सीसीटीएनएस आणि ई-गव्हर्नन्समध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. या उपक्रमांबद्दल पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाचे व जिल्हा पोलीस दलाचे अभिनंदन केले.    

 

नव्या चार व्यापक कामगार संहितांमुळे कामगारांच्या हक्कांचे बळकटीकरण व औद्योगिक संरचनेत लवचिकता साधल्यामुळे उद्योग आणि कामगार दोघांनाही फायदा होणार आहे. अकोला येथे कामगारभवन लवकरच निर्माण होणार आहे, असे सांगून त्यांनी कामगार विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली.  विकासाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी शासन- प्रशासनासोबतच लोकसहभाग अत्यंत महत्वपूर्ण असतो.  त्यासाठी सर्वांनी अधिक कृतीशील होण्याचा होण्याचे आवाहन त्यांनी केले.

वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, तसेच विविध उल्लेखनीय कार्य करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा गौरव पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाला. जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात १८ नवीन वाहने दाखल झाली. त्याचे लोकार्पणही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. मृद व जलसंधारणाची व्यापक जनचळवळ उभी करण्यासाठी  जलसंधारण सप्ताह व अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आज स्वातंत्र्यदिनी मुख्य शासकीय समारंभात सर्व उपस्थितांनी मृद व जलसंवर्धनाची शपथ घेतली.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन