स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा पात्र विद्यार्थ्यांना सहायक आयुक्त समाज कल्याण यांचे आवाहन
स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा
पात्र विद्यार्थ्यांना सहायक आयुक्त समाज कल्याण यांचे आवाहन
अकोला, दि. ६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी लाभ सुरू ठेवण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी नूतनीकरणाचे ऑनलाइन अर्ज १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
ज्या विद्यार्थ्यांना सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेचा लाभ मिळाला असून ते सध्या इयत्ता १२ वी, सर्व व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या द्वितीय, तृतीय किंवा चतुर्थ वर्षात शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांनी hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन विहित मुदतीत नूतनीकरणाचा अर्ज ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.
विहित मुदतीत अर्जाचे नूतनीकरण न करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ घेण्याची इच्छा नाही, असे गृहीत धरून त्यांचा अर्ज अपात्र करण्यात येईल. तसेच अशा विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे समाज कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता वेळेत अर्ज सादर करावा. त्यामुळे भविष्यात लाभ मंजुरी प्रक्रियेदरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ अखंडितपणे मिळण्यासाठी १५ सप्टेंबरपूर्वी नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा